मुंबई – करोना काळात मुंबई महानगरपालिकेने औषधांसाठी आणि जंतुनाशकांसाठी वाढीव दराने निविदा मागवत आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. यावरून शेलारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, न्यायालयाने आशिष शेलार यांनाच फटकारले असून आधी पाच लाख भरा, मग सुनावणी घेऊ, असे सुनावले आहे.
मुंबई महानगरपालिकेने औषध आणि जंतुनाशकांसाठी २१ ऑगस्ट २०२० साली निविदा काढल्या होत्या. महानगरपालिकेने या निविदा काढताना जागतिक आरोग्य संघटना तसेच केंद्र सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही. तसेच जंतुनाशकांचा दर्जाही राखला नसल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला.
यासंदर्भातील याचिका अॅड. दीपा चव्हाण यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश पुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.