कृषिमंत्री दादा भुसे यांची ग्वाही
पुणे – महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यासाठी वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार फेब्रुवारीअखेर लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. पुणे दौऱ्यादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर पीकासाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा वाढत आहे. या गटकाला दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने पावले उचलली आहेत. दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलीत केली आहे. पंचनामे, देय रक्कम यांची जुळवणी करण्याचे काम सुरू आहे. येत्या महिनाभरात हे काम अंतिम टप्प्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, रब्बी हंगामाकरिता राज्यातील दहा जिल्ह्यांकरिता विमा कंपन्यांनी निविदा भरल्या नसल्याबाबत ते म्हणाले की, या कंपन्यांनी या दहा जिल्ह्यांत निविदा भरल्या नसल्या, तरीदेखील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी राज्य सरकार घेणार आहे.