अंकली (कर्नाटक) – करोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे बंद असलेला संतांचा पायी वारी पालखी सोहळा यंदा होणार असून या आषाढी वारीत संत ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी टाळ मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करीत अंकली (बेळगांव) येथून श्रीमंत उर्जीतसिंह शितोळे सरकार यांच्या हिरा व मोती या दोन अश्वानी श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान ठेवले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवार (दि २१ जून) रोजी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवीत आहे. या आषाढीवारी पालखी सोहळ्यात श्रीमंत उर्जीतसिंह शितोळे सरकार यांचे दोन अश्व सहभागी होतात. आज शुक्रवार (दि १०) रोजी सकाळी १० वाजता या अश्वांची विधीवत पूजा करण्यात आली. टाळ मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष करीत या दिंडी सोहळ्यासमवेत अश्वांनी श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान ठेवले.
तत्पूर्वी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी अंकलीकर राजवाड्यात श्रीच्या अश्वांचे स्वागत करून दर्शन घेतले. त्यांनी यावेळी श्रीमंत शितोळे सरकार यांचे समवेत पालखी सोहळ्याबाबत चर्चा करून पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत माहिती दिली. कोरोनानंतर प्रथमच तब्बल दोन वर्षानी पायी वारी पालखी सोहळा निघत असलेने श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांनी समाधान व्यक्त केले. वारीच्या काळात कोणालाही कोरोनाची बाधा होवू नये अशी त्यांनी माऊली चरणी मागणी केली.
अंकली गावातील राजवाड्यातून श्रींच्या अश्वांचे हरीनाम गजरात प्रस्थान झाल्यानंतर अंकली नगर प्रदक्षिणा, महाप्रसाद झाल्यावर मांजरीवाडी, कागवाड मार्गे हा सोहळा म्हैसाळकडे मार्गस्थ झाला. अश्वांचा पहिला मुक्काम मिरज येथे आहे. अश्व आळंदीत सोमवार (दि . २०) जून रोजी दाखल होणार आहेत. अश्व आल्यानंतर आळंदीच्या वेशीवर अश्वांचे परंपरेप्रमाणे सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार व आळंदी देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. तत्पूर्वी पुणे आळंदी मार्गावरील श्रीकृष्ण मंदिरात (बिडकर वाडा) सरदार हरप्रीतसिंह बिडकर परिवाराच्या वतीने अश्वांचे स्वागत होणार आहे.
या अश्व प्रस्थान सोहळ्यास श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, महादजी शितोळे, हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर, ज्ञानेश्वर गुंळुजकर, निवृत्ती चव्हाण, राहुल भोर, अजित परकाळे, विजय परकाळे, अतुल वाल्हेकर यांच्यासह वारकरी उपस्थित होते.