बुध -खंडाळा वनपरिक्षेत्रातील सामाजिक वनीकरण विभागाने राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्षलागवड योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत सुखेड गावात घोगरयाळ येथील गायरान जागेमध्ये ‘वनराई’ फुलविली आहे. दोन वर्षांपूर्वी येथील पाच हेक्टर गायरान जागेमध्ये वड, उंबर, पिंपळ, लिंब, आंबा, सीताफळ, जांभुळ, आवळा, बदाम,काशीद, हिरडा, बेहडा, कांचन, आपटा, शिवण अशा वेगवेगळ्या जातींचे सुमारे आठ हजार झाडांचे रोपवन तयार केले आहे. दोन वर्षांपासून येथील रोपवनाची अतिशय नियोजनबद्द काळजी घेतल्यामुळे येथील 100 टक्के झाडे दिमाखात डुलत आहेत.
संपूर्ण खंडाळा तालुक्यातच या विभागामार्फत उत्तम काम झाले आहे. सुखेडसोबतच मोर्वे, कोपर्डे या गावीदेखील अशा प्रकारे रोपवन तयार केले आहे. कोपर्डे गावात एकाच ठिकाणी 40 हेक्टर क्षेत्रावर एकूण 44 हजार 440 रोपे लावण्यात आलेली असून तेथील कामेही उत्कृष्ट झालेली आहेत. मागील वर्षी राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत खंडाळा तालुक्यात एकूण 212 हेक्टर क्षेत्रावर 24 रोपवनात कामे झाली आहेत.
खंडाळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मारुती पारधी, गंगाराम झांजरे (वनपाल), वनरक्षक आनंदा भालेकर तसेच सुखेड गावातीलच कुंडलिक धायगुडे (रोजंदारी संरक्षण मजूर) या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करून दाखविला आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी हे काम कौतुकास्पद आहे. रोपवन संवर्धनासाठी ग्रामस्थांचे या विभागाला नेहमीच सहकार्य राहिल, सुखेडचे ग्रामस्थ श्रीरंग धायगुडे- पाटील यांनी सांगितले.