विविध आजारांनी नागरिक बेजार ः खासगीसह सरकारी रुग्णालयेही फुल्ल
रांजणी-कालावधी संपल्यानंतरही सत कोसळणारा पाऊस त्यामुळे होणारा वातावरणातील बदल यामुळे जिल्ह्यात विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आंबेगाव तालुक्यातील विविध गावांतील दवाखान्यात रुग्णांची गर्दी होत असल्याने खासगीसह सरकारी रुग्णालसयेही फुल्ल झाली आहेत. मंचर उपजिल्हा रुग्णालय आणि शहरातील इतर खासगी हॉस्पिटलमध्ये शंभरहून अधिक डेंग्यू सदृश्य ताप आलेले रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे तालुक्यात एकूणच नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही वर्षात यंदा प्रथमच तालुक्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे. या पावसामुळे शेतीच्या नुकसानी बरोबरच रुग्णांच्या आजारात देखील वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्यात डेंग्यूची लागण झालेले अनेक रुग्ण आढळून आले असून या रुग्णांवर सरकारी आणि खासगी दवाखान्यात उपचार केले जात आहे. गरीब रुग्णांना खासगी दवाखान्यात डेंग्यूच्या तापावरील उपचार घेणे शक्य नसल्याने अनेक गरीब रुग्ण सरकारी दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यामुळे सरकारी दवाखान्यातरुग्णांची संख्या वाढत चालली असल्याचे येथील सरकारी दवाखान्यातील सुत्रांनी सांगितले.
तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या मंचर शहराबरोबरच तालुक्यात एकूण 50 हून अधिक रक्त तपासणीच्या प्रयोगशाळा आहेत. त्यांच्या आकडेवारीनुसार विशेषत: डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये मुलांचा समावेश सर्वाधिक आहे. खासगी दवाखान्यात एका रुग्णाला बरे होण्यासाठी किमान 12 ते 15 हजार रुपये खर्च करावा लागतो. हा खर्च गरीब आणि आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या रुग्णांना न परवडणारा आहे. त्यामुळे बहुतेक रुग्ण सरकारी दवाखान्यांमध्ये उपचाराकरिता धाव घेत असल्याचे चित्र पहायला मिळते.
- डास निर्मूलन मोहिम राबवावी
एकूणच गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सतत होत असलेल्या पावसामुळे गटारात पाणी साचलेले आहे. ग्रामपंचायती आणि आरोग्य विभागाकडून अद्यापही योग्य पद्धतीने उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे डासांच्या संख्येत वाढ झाली आहे. ग्रामपंचायतींनी डेंग्यू डासांचे निर्मूलन करण्यासाठी डास निर्मूलन मोहिम प्रभावीपणे राबविण्याची नितांत गरज आहे. ही मोहिम यशस्वी ठरली तर डेंग्यू डास सदृश ताप येणाऱ्या रुग्णांमध्ये निश्चितच घट येईल. - आंबेगाव तालुक्यातील चास-कडेवाडी येथील दोन, घोडेगाव आणि कळंब येथे प्रत्येकी एक असे डेंग्यूचे चार रुग्ण आढळून आले आहेत. या गावांमध्ये तसेच इतर गावांतही खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना आणि जनजागृतीचे काम सुरु आहे.
-डॉ. सुरेश ढेकळे, तालुका आरोग्य अधिकारी - वैद्यकीय क्षेत्रात निष्णांत असलेल्या डॉक्टरांकडून रुग्णांवर चांगल्या प्रकारचे उपचार देण्यात येत असल्याने नागरिकांनी किंवा रुग्णांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. डेंग्यूसदृश्य तापावर उपचार चांगल्या प्रकारे केल्याने रुग्ण चांगला ठणठणीत होऊ शकतो.
-डॉ. हर्षद शेटे, संजिवन एम. डी. मेडीसिन मंचर - खेड्यातील ग्रामपंचायतींनी डेंग्यू डास प्रतिबंधक औषधांच्या फवारण्या करणे गरजेचे आहे. पावसामुळे डासांची संख्या वाढत असली तरी डेंग्यू डास प्रतिबंधक औषधांच्या फवारण्या केल्या तर त्यावर निश्चित प्रतिबंध येऊ शकतो.
-अंकुश थोरात, सरपंच जाधववाडी