न्हावरे/योगेश मारणे – शिरुर तालुक्याच्या पूर्व भागातील भीमा नदी काठच्या गावांत गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी भीमा नदीला आलेल्या महाभयंकर पूरामुळे गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. पुराचे पाणी येऊन गेलेले सुमारे वीस ते पंचवीस दिवस झाले. मात्र, त्यानंतर आता भीमा नदी काठच्या परिसरात विविध साथीच्या जीवघेण्या आजारांनी डोकेवर काढले असून, नदीकाठचे नागरीक आजारांनी त्रस्त झाले आहेत.
मांडवगण फराटा येथील चंदननगर परिसर पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली गेलेला होता. तसेच गावामध्येही पाणी शिरले होते. पाणी ओसरल्यानंतर आणि जैसे थे परिस्थिती झाल्यानंतर नदीकाठच्या भागांमध्ये साथीच्या आजारांनी एकच थैमान घातले आहे. यामध्ये जुलाब, उलट्या,थंडी-ताप, गोचीड ताप, डेंगू, कावीळ यासारख्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेला पाठवलेल्या अहवालात सुमारे 10 ते 12 संशयित डेंग्यूच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी आठ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये वडगाव रासाई परिसरातील 2 रुग्ण, मांडवगण फराटा परिसरातील गारमाळ येथील 4 रुग्ण, मांडवगण फराटा गावठाणातील 2 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुढील खबरदारी म्हणून वरील डेंग्यू संसर्ग आढळलेल्या रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आलेले आहेत.
नदीकाठच्या परिसरामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून अनेक ठिकाणी दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नदीच्या पुराचे पाणी आलेल्या परिसरामध्ये औषध धुरळणी करून स्वच्छता करण्यात यावी.अशी मागणी नागरीक करत आहेत.तसेच पुराच्या पाण्यामुळे ठिकठिकाणच्या पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून ते खड्डे बुजवण्यात यावेत. त्याचप्रमाणे परिसरामध्ये रिकाम्या पडलेल्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे टायर रिकाम्या नारळाच्या करवंट्या या त्वरित नष्ट कराव्यात तसेच डासांची पैदास पाण्यामध्ये होत असल्याने पाणी साचणार नाही. याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र खबरदारी म्हणून आरोग्य विभागाकडूनही मोठ्या प्रमाणावर जनजागरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.