बच्चू कडू यांच्यसह पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
मुंबई: राज्यात परतीच्या पावसाने शवतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून राजकीय नेते मंडळी मात्र सत्ता स्थापनेची गणिते जुळवण्यात व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यपालांचं लक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा हि मागणी घेऊन मोर्चा काढला.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा पोलिसांनी नरिमन पॉईंट येथे अडवला. तसेच बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर कडू यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या वाहनांसमोर ठिय्या देत आंदोलन सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या सर्व प्रकारानंतर मात्र बच्चू कडू भलतेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट राज्यपालांनाच आव्हान दिलं आहे.
“पुढील 5 दिवसांतच आम्ही राजभवानावर येऊन धडकणार आहोत. तुमच्यात हिंम्मत असेल तर अडवून दाखवाच” असा इशारा त्यांनी राज्यपालांना दिला आहे. अवकाळी आलेल्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. परंतु राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपालांकडे सर्व अधिकार आले आहेत. त्यामुळे राज्यपालांकडे आम्हाला गाऱ्हाणं मांडायचं आहे असंही कडू यांनी सांगितलं.