“वंचित’ आघाडीचा इशारा; “एनआरसी’ विरोधात ठरावासाठी शनिवारी आंदोलन
सातारा – केंद्र सरकारने “एनआरसी’चे पहिले पाऊल म्हणून “एनपीआर’ची अंमलबजावणी दि. 1 मे पासून करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील एससी, एसटी, ओबीसी, मुस्लिम व अल्पसंख्याक धोक्यात येणार असून जिल्ह्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी विधानसभेमध्ये “एनपीआर’ व “एनआरसी’ विरोधात ठराव करावा, या मागणीसाठी शनिवारी (दि. 22) दोन्ही कॉंग्रेसच्या खासदार, आमदारांचे निवासस्थान, दोन्ही पक्षांच्या जिल्हा कार्यालयांच्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती आघाडीचे जिल्हा प्रमुख समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी दिली.
केरळ, पंजाबसहित अनेक गैरभाजप राज्य सरकारांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून “सीएए’, “एनआरसी’, “एनपीआर’ विरोधात ठराव केले. महाराष्ट्रातील गैरभाजप सरकारने अद्याप असा कोणताही ठराव केला नाही. राज्य सरकारने या कायद्याविरोधात तात्काळ ठराव पारित न केल्यास राज्यातील 40 टक्के एससी, एसटी, ओबीसी, मुस्लिम व अल्पसंख्याक धोक्यात येणार आहेत.
विधानसभेमध्ये बहुमताने एनपीआर, एनआरसी विराधी ठराव करावा राज्यभर कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांच्या विधानसभा क्षेत्रातील कार्यालय किंवा निवासस्थान तसेच जिल्हा कार्यालयावर प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन होणार असल्याचे खंडाईत यांनी पत्रकात म्हटले आहे.
वंचित आघाडीच्यावतीने शनिवारी ना. बाळासाहेब पाटील, ना. रामराजे नाईक निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण यांच्या कार्यालय किंवा निवासस्थानी विनंती निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील एससी, एसटी, भटके विमुक्त, आदिवासी, मुस्लिम, अल्पसंख्यांक समुदायाच्या वेगवेगळ्या संघटना व वंचित बहुजन आघाडीचे सर्व समन्वयक, भारिप बहुजन महासंघाच्या सर्व विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खंडाईत यांनी केले आहे.