पवनानगर (वार्ताहर) – मावळ तालुका कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पूर्व तयारी म्हणून व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पेरणीपूर्व तपासणी प्रात्यक्षिक उपक्रम राबविण्यात आला.
करोना लॉकडाऊन काळात गावात बैठका घेता येत नसल्यामुळे यंदाच्या वर्षी खरीप पेरणीसाठी स्वतःकडील उपलब्ध असणारे सोयाबीन बियाणे उगवणक्षम आहे की नाही याची खात्री करून घेतली जात आहे. बियाणे खात्रीकरिता कृषी विभागाकडून प्रात्यक्षिक राबविण्यात आले. सर्व प्रथम गोणपाटाचे चौकोनी तुकडे करून तीन नमूने तयार करावे. ते ओले करून त्यावर 100 दाणे मोजून ते दीड ते दोन से. मी. अंतरावर 10-10 च्या रांगेत ठेवावे असे 3 नमूने तयार करावे. पाणी मारून वरून गोणपाट झाकून गोल गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवावे. अधून-मधून पाणी मारावं व 6-7 दिवसानंतर कोंब आलेले दाणे वेगळे करून 100 पैकी 70 दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर ते बाजारातील गुणवत्तेचे आहे, असे समजण्यात येते.
शिफारशीनुसार पेरणीसाठी वापरा पेरणी करताना बियाण्याला थायरम कार्बनडॅझीम किंवा ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकांची तसेच रायझोबियम, पी. एस. बी या जीवाणू संर्वधकाची बीजप्रक्रिया करा. तसेच दुसऱ्या पद्धतीने म्हणजे 100-100 दाण्याचे 3 संच तयार करून काचेच्या 3 ग्लासात पाणी घेऊन त्यात हे 100 दाणे टाका. 5-7 मिनिटांनंतर दाणे वेगळे काढा व त्यामधील पूर्णत फुगलेले व बियाणाच्या टरफलावर सुरकुत्या पडलेले बियाणे वेगळे करा आणि ते मोजून घ्या.
फुगलेले बियाणे टरफलात पाणी गेल्यामुळे पेरणीसाठी अयोग्य आहे. सुरकुत्या पडलेले पेरणीयोग्य आहे, असे समजावे. अशा प्रकारचे प्रात्यक्षिक सहाय्यक कृषी अधिकारी प्रियंका पाटील यांनी प्रगतशील महिला शेतकरी अनिता गायकवाड यांच्या शेतात करून दाखवले.
मावळ तालुक्यात सोयाबीन पिकाच्या पेरणीचे काम सुरू आहे. प्रात्यक्षिक उपक्रमात वडगाव मंडळ कृषी अधिकारी व्ही. व्ही. कुलकर्णी, आणि कृषी पर्यवेक्षक डी. डी. तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात येत आहे.