पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सध्या ठिकठिकाणी अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे. यात विविध राजकीय संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांच्या होर्डिंगचे प्रमाण जास्त असून, अनेक ठिकाणी पोस्टर्स व होर्डिंगचा भडिमार झाला आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले असून, याबाबत महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शहरात चिंचवड, काळेवाडी, भोसरी, निगडी, चिखली यांसह ठिकठिकाणी अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटल्याचे दिसत आहे.
यात वाढदिवसानिमित्त किंवा निवड नियुक्तीनिमित्त शुभेच्छा देणाऱ्या होर्डिंगचे प्रमाण जास्त आहे. वाढदिवस होऊन गेल्यानंतरही कित्येक दिवस हे होर्डिंग तसेच ठेवण्यात येतात. शहरातील किरकोळ पत्राशेडवर कारवाई केली जाते. मात्र बड्या नेत्यांना शुभेच्छा देणाऱ्या होर्डिंगवर कारवाई का केली जात नाही, अशी ओरड नागरिकांतून होत आहे.
विविध सण उत्सवानिमित्त आतापर्यंत शहरातील जवळपास प्रत्येक चौकात विविध पक्षांचे, सार्वजनिक मंडळाचे स्वागतपर कमानी, होर्डिंग व स्वागतफलक लावले जात आहेत. अनेक ठिकाणी उत्सव उरकला तरीदेखील स्वागत कमानी व स्वागत फलक तसेच ठेवण्यात आले आहेत. महापालिकेच्या संबंधित विभागातर्फे या होर्डिंगकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे शहराच्या मुख्य रस्त्यांपासून ते कानाकोपऱ्यातही बेकायदेशीर होर्डिंग आणि बॅनर्स लागल्याचे दिसून येत आहे. राजकीय वर्चस्व असलेल्या भागात रस्त्यांवरील फुटपाथवर अतिक्रमणासह अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे.
सिग्नल आणि वाहतूक नियमांना अडथळा
शहरातील विविध भागांत बेकायदेशीररित्या उभारलेले होर्डिंग वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. काही भागात सिग्नल यंत्रणा होर्डिंगमुळे झाकली गेली आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण करण्यात अडथळा होत आहे. स्थानिक मंडळे आणि संस्थांकडूनही भरमसाठ होर्डिंग आणि बॅनरबाजी सुरू आहे. या बॅनर्सची उंचीही खूप मोठी असून, राजकीय बलाबल सिद्ध करण्याचा प्रयत्न यातून होताना दिसत आहे.
शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचे स्वप्न एकीकडे पाहिले जात असतानाच दुसरीकडे मात्र राजकीय पक्षांकडूनच शहर विद्रुपीकरण करण्यात येत आहे. चौकाचौकांत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स सह होर्डिंग व पोस्टर्स लावण्यात येत असल्याने, शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे.
विनापरवाना होर्डिंग आणि बॅनरवर कारवाई करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बेकायदा होर्डिंगमुळे यापूर्वी पावसाळ्यात दुर्घटना घडल्या होत्या. त्यामुळे एखाद्या अप्रिय घटनेनंतरच बेकायदा होर्डिंगवर कारवाई करणार का असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.