रोम – रोममधील भारतीय दूतावासात तोडफोड करण्यात आली आहे. या तोडफोडीच्या प्रकाराबद्दल भारताने तीव्र शब्दांत इटलीकडे निषेध नोंदवला आहे. ही घटना प्रजासत्ताक दिन साजरा होण्याच्या काहीवेळ आधी घडली.
भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळयाच्या काही वेळ आधी खलिस्तानी तत्त्वांनी इटलीतील रोममधील भारतीय दूतावासाच्या इमारतीत घुसून तोडफोड केली.
रोमधील भारतीय दूतावासाबाहेर काही खलिस्तानी समर्थक जमले होते. या हल्लेखोरांनी दूतावासात घुसखोरीचा प्रयत्न करत तोडफोड केली. यावेळी तोडफोड करणारे हल्लेखोर खलिस्तानचे झेंडे घेऊन आले होते. “खलिस्तान झिंदाबाद’ म्हणूनही त्यांनी भिंतीवर लिहिले होते. या तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, या प्रकाराची भारत सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की, तोडफोडीचा हा विषय आम्ही लावून धरला आहे. तसेच याबद्दल वाटणारी चिंताही त्यांना कळवली आहे. इमारत परिसर आणि सर्व भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी इटली सरकारची आहे, अशी माहिती त्यांनी दिली.