पुणे – मेट्रोसाठी विद्यापीठ चौकातील चांगला उड्डाणपूल पाडणे अव्यवहार्य आहे. सरकारला अधिक खर्चात टाकणारा हा प्रस्ताव आहे. याच पुलाला समांतर अशी मेट्रोची लाईन टाकून हा पूल वाचवणे आवश्यक असल्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी म्हटले आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोमार्गासाठी विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. पुण्याच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून अनेक ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे प्रस्ताव मी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री असताना मंजूर करण्यात आले होते. या पुलाचा आराखडा नामवंत विदेशी तज्ज्ञांकडून करण्यात आला असून या पूल स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत योग्य व उपयुक्त असल्याचे शिवरकर यांनी म्हटले आहे.
केवळ मेट्रोसाठी याच पुलाला समांतर अशी लाईन घेऊन त्यावर मेट्रोचा मार्ग उभारता येणे शक्य आहे. किंबहुना जवळूनच दुसरा पर्यायी मार्ग काढूनही हा पूल वाचविता येणे शक्य आहे. मेट्रोच्या बाबतीत अनेक ठिकाणी असे पर्यायी मार्ग काढण्यात आले आहे. त्यामुळे हा पूल पाडून खर्च वाढवणे सद्याच्या आर्थिक अडचणीच्या काळात तर अनावश्यक आहे.