मुंबई – कर्नाटक विधानसभेत शक्तिपरीक्षा जिंकण्यात कॉंग्रेस-जेडीएस आघाडीला मंगळवारी सपशेल अपयश आले. त्यामुळे त्या राज्यातील 14 महिन्यांचे आघाडी सरकार कोसळले. त्यातून कर्नाटकात जवळपास तीन आठवडे सुरू असलेल्या राजकीय नाटकावर अखेर पडदा पडला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज आपले मुखपत्र सामना संपादकीयमधून विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले आहे. सोबतच कर्नाटकातील राजकीय तमाशा एकदाचा संपला आहे. असेही म्हटले आहे.
काय आहे सामना संपादकीय
‘लोकशाहीचे अनेकदा मुडदे पाडणाऱ्यांनी कर्नाटकात लोकशाहीची हत्या झाली असे गळे आता काढावेत ही मोठीच मौज म्हणायची! सर्वाधिक 104 जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने लोकशाहीची हुकमी युक्ती वापरली. तो टेकू आता थोडासा सरकला आणि कुमारस्वामी सरकारचा डोलारा कोसळला. याचा अर्थ स्पष्ट आहे लोकशाही तेव्हाही जिंकली, आजही जिंकली, लोकशाही जिवंत आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानातही ती अशीच जिवंत राहील काय, एवढेच आता पाहायचे!’, असेही मत मांडले आहे.