कृषी क्षेत्रावरील दीर्घकाळचा ताण, शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पन्नात जवळपास वाढ न होणे यामुळे ग्रामीण भागातून विविध बाबींची मागणी मंदावली आहे. कमाईत घट होत असल्याने केवळ शेतकरीच नव्हे तर भूमिहीन मजुरांवरही परिणाम झाला आहे. देशातील ग्रामीण कटुंबांपैकी अशा कुटुंबांची संख्या 33 टक्के एवढी आहे.
मूल्याचा विचार केला तर सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत ग्रामीण भागातील मागणीत पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी या काळात ही वाढ 20 टक्के एवढी होती. गेल्या वर्षी शहरी भागातील मागणीतील वाढ 14 टक्के होती यंदा ती वाढ 8 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
शहरी आणि ग्रामीण भागाचा एकत्रित विचार केला तर वाढीचा वेग गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत 16.2 टक्के होता. तो यंदाच्या तिमाहीत 7.3 टक्क्यांवर आला आहे. अनियमित आणि काही ठिकाणी झालेल्या जोरदार वृष्टी व पूराचा तेरा राज्यांना फटका बसला आणि शेतकऱ्यांची स्थिती आणखी खालावली. त्याचा परिणाम रोज लागणाऱ्या वस्तूंच्या (एफएमसीजी) मागणीवर झाला. नेल्सन या संस्थेने यासंदर्भातील पाहणी केली आहे.
जूनमध्ये नेल्सनने एफएमसीजी बाजारपेठेतील वाढीचा वेग 11-12 टक्के असेल असे म्हटले होते. आता हा वेगळ 9 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचे सूचित केले आहे. वेष्टणातील वस्तूंचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांवर याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.