सोरतापवाडी-उरुळी कांचन येथे करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तलाठी कार्यालयाचे कोणतेही सहकार्य मिळत नाही. त्यामुळे येथील तलाठी यांची ताबडतोब बदली करून एक सक्षम अधिकारी या मोठ्या ग्रामपंचायतीला मिळावा, असे निवेदन ग्रामपंचायतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा अधिकारी, हवेलीचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे. त्या निवेदनात म्हणले आहे की, करोना विषाणू उद्रेकाबाबत तलाठी कार्यालयाचे कोणतेही सहकार्य ग्रामपंचायतीस मिळत नाही.
गावात हे अधिकारी उपलब्ध होत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देऊन ते जबाबदारी झटकत आहेत. किराणा दुकानदार जास्त भावाने मालविक्री करत असून स्टिंग ऑपरेशन होऊनसुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. गावास कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत. तरी आपणांमार्फत योग्य ती कारवाई करण्यात यावी व गावास एक सक्षम अधिकारी मिळावा.