नागरिकांनी महावितरणला दिले निवेदन
पाथर्डी (प्रतिनिधी) – शहरातील रंगार गल्ली, लोणार गल्ली जिरेसाळ गल्ली, राममंदिर परिसर, चिंचपूर रोड परिसरात गेल्या काही दिवसापासून कमी दाबाने वीज पुरवठा होत असुन वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त असून शहरातील वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशी मागणी माजी नगरसेवक रामनाथ बंग यांनी निवेदनाद्वारे वीज वितरण कंपनीकडे केली आहे.
यासंदर्भात वीज वितरण कंपनीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,वरील भागचा वीज पुरवठा हंडाळवाडी सबस्टेशन येथून होतो. सबस्टेशनच्या नेहमीच्या तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे व मिळतो तोही कमी दाबाने असतो. या सब स्टेशनकडे वीज वितरण कंपनीचे फारसे लक्षण नाही. रात्री-अपरात्री वीज खंडित झाल्यास तात्काळ दुरुस्ती होत नाही.
कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने घरातील अनेक विद्युत उपकरणे खराब झाले आहेत. तरी परिसरातील विद्युत रोहित्रांचा लोड कमी करून वीज पूरवठा सुरळीत करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नगरसेविका दिपाली बंग, माजी नगरसेवक रामनाथ बंग, नंदकिशोर दायमा, सुभाष रोडी, नरेंद्र रोडी, सुंदर कांबळे, तुषार दारके, अशोक रोडी, कौतुक चिंतामणी, प्रशांत रोडी, संतोष भागवत, अमोल आखडकर, रामभाऊ बजाज, अभिजित गुजर यांच्यासह शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.