पुणे – भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराबाबत अधिक माहिती असल्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाकडे सादर करावी. याबाबत आयोगाने त्यांना समन्स बजावावा, अशी मागणी करणारा अर्ज एका व्यक्तीने भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाकडे गुरुवारी केला.
पवार यांनी 18 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतली. यात पोलीस दलाचा ज्या पद्धतीने गैरवापर झाला आहे त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. तसेच, मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर एक वेगळे वातावरण तयार केले होते, असे पवार त्यात म्हणाले होते.
यावरून या घटनेबाबत पवार यांच्याकडे अधिक माहिती असल्याचे दिसते. जी त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आयोगासमोर सादर केलेली नाही. त्यामुळे न्याय होण्याच्या दृष्टीने आयोगाने पवार यांना समन्स बजवावा आणि त्यांनी संबंधित माहिती आयोगाकडे जमा करावी, अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. सागर शिंदे यांनी हा अर्ज आयोगाकडे सादर केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच मतभेदानंतर या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यास मंजुरी दिली होती. एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हिंसा ही दोन्ही प्रकरणे वेगळी असून भीमा-कोरेगाव प्रकरण केंद्राकडे देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर स्पष्ट केले होते.
चौकशीबाबत राज्य आणि केंद्र सरकारमधील वाद शांत होत नाही तोच पवारांनाच समन्स बजावण्याची मागणी करणारा अर्ज दाखल झाला आहे. आयोगाच्या पुढील तारखेस त्यावर सुनावणी होऊ शकते. शिंदे यांनी भीमा-कोरेगाव हिंसेबाबत एक प्रतिज्ञापत्र यापूर्वी आयोगाकडे सादर केले आहे. आयोगाची पुढील सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्या दिवशी या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे ऍड. आशिष सातपुते यांनी सांगितले.