जिंद – हरियाणातील जिंदमध्ये बुधवारी महापंचायत भरवून केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. महापंचायतीमध्ये सहभागी होऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. कायदेवापसी न झाल्यास सत्तावापसीची मागणी पुढे येईल, असे त्यांनी म्हटले.
आतापर्यंत शेतकरी केवळ कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत आहेत. पण, सत्तेतून हटण्याची मागणी पुढे आल्यास काय होईल याचा विचार सरकारने करावा, अशा आक्रमक शब्दांत टिकैत यांनी भूमिका मांडली.
दिल्लीच्या सीमांवर आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मोठी नाकेबंदी करण्यात आली आहे. मोठे अडथळे उभारण्याबरोबरच रस्त्यांवर खिळेही ठोकण्यात आले आहेत. त्याचा संदर्भ देऊन टिकैत म्हणाले, जेव्हा राजा घाबरतो; तेव्हा तो किल्ला आणखी सुरक्षित करू पाहतो.
मात्र, रस्त्यांवरील खिळ्यांची तमा शेतकरी बाळगणार नाही. इतरांना पुढे जाता यावे यासाठी प्रसंगी त्या खिळ्यांवर मी आडवा होईन. आंदोलन चालूच राहील. पण, ते शांततेने होईल याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी. शेतकऱ्यांचे आंदोलन अधिकाधिक मजबूत बनत आहे. आंदोलनाला मिळणारा पाठिंबा पाहता आम्ही हा लढा नक्कीच जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हरियाणात मोठे महत्व असणाऱ्या खाप पंचायतींचे अनेक नेते महापंचायतीला उपस्थित होते. महापंचायतीसाठी झालेल्या प्रचंड गर्दीने एकप्रकारे शेतकऱ्यांच्या ताकदीचे दर्शन घडवले. टिकैत यांच्या भाषणाआधी शेतकरी नेते बसलेले व्यासपीठ कोसळले. मात्र, कुणालाही दुखापत झाली नाही. महापंचायतीत पाच मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले.
कृषी कायदे मागे घ्यावेत, किमान आधारभूत किमतीला (एमएसपी) कायदेशीर हमी द्यावी, स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत आणि अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची सुटका करावी अशा मागण्या ठरावांद्वारे मांडण्यात आल्या.