नवी दिल्ली – देशभरातील कोविड-19 ची साथ आणि पुरांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नागरी सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
त्या याचिकेवरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात ‘यूपीएससी’ला नोटीस बजावली. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 28 सप्टेंबरपर्यंत तहकूब ठेवली.
नागरी सेवा परीक्षा 2-3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. ‘यूपीएससी’च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या 20 उमेदवारांनी ही याचिका दाखल केली आहे.
दरम्यान ‘यूपीएससी’ने भरतीसाठी जुलै आणि ऑगस्ट 2020 मधील अंतिम निकाल जाहीर केले आहेत. नियुक्तीसाठी ज्या उमेदवारांच्या निवडीची शिफारस करण्यात आली आहे, त्यांना स्वतंत्रपणे टपालाने त्यांचे निकाल कळविण्यात आले आहेत, असे ‘यूपीएससी’ने जाहीर केले आहे.