खोडद (वार्ताहर) – करोना व्हायरसच्या महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर 25 मार्च 2020 पासून सर्व महाई-सेवा केंद्र बंद करण्यात आली आहेत. आता 5 व्या लॉकडाऊनच्या टप्प्यात सरकारने काही प्रमाणात शिथिलता आणली असून, बरेचशे व्यवहार, उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत; परंतु महा-ई सेवा केंद्र सुरू करण्याबाबत प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे जुन्नर तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याने प्रशासनाने जुन्नर तालुक्यातील महा-ई सेवा केंद्र सुरू करावीत अशी मागणी तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थी करीत आहे.
लॉकडाऊनच्या 5 व्या टप्प्यातील कंटेन्मेंट क्षेत्र वगळता इतर ठिकाणी 3 महिन्यापासून बंद असलेली महाई-सेवा केंद्र सुरू होतील, त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातीलही सेवा केंद्रे सुरू होण्याच्या आशेवर नागरिक होते; परंतु ही सेवाकेंद्रे सुरू न झाल्यामुळे सर्वत्र नाराजी पसरली आहे. आता केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्यांना एक वर्षासाठी दीड लाख रुपयांची किसान क्रेडिट कार्ड देण्यात येत आहेत; परंतु या सेवेमध्ये पात्र ठरण्यासाठी प्रमाणीकरन करता येत नाही, मुलांच्या शैक्षणिक कागदपत्रांचीही प्रक्रिया रखडली असून, सध्या दस्तनोंदणी प्रक्रिया चालू झाली आहे. यासाठी प्रतिज्ञापत्राची आवशकता असते, तसेच बॅंकांकडून शेतकऱ्यांना कर्जासाठी विविध कागतपत्रे, आधारकार्ड या सेवा महाई-सेवा केंन्द्रामार्फत दिल्या जातात. मात्र, ही सेवाकेंद्रे तीन महिन्यांपासून बंद असल्यामुळे सर्वांचीच गैरसोय होत आहे.
आम्ही सुद्धा अडचणीत…
तीन महिन्यांपासून ही केंद्रे बंद असल्यामुळे येथील कर्मचारीसुद्धा बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊन किती दिवस राहणार हे माहीत नसल्यामुळे आम्हीसुद्धा मोठ्या अडचणीत सापडलो आहोत. जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश येईपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही. जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेश देताच महाई-सेवा केंद्र सुरू करण्यात येतील, अशी माहिती महा ई-सेवा चालकांनी दिली.