नगर (प्रतिनिधी) – करोना महामारीने संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. अनेक युवकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. करोनाशी लढत असताना अर्थव्यवस्थेला चालना देण्याची प्रामुख्याने गरज असून, पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या वतीने महारोजगार योजना राबविण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती ऍड. कारभारी गवळी यांनी दिली आहे.
मागील वर्षी चांगला पाऊस होऊन देखील माजी मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांच्या कार्यकाळात मत्स्य व्यवसायाला चालना मिळाली नाही. माजी मत्स्य विकास मंत्री निवडणुकीच्या कामात गुंतल्याने जलस्त्रोतामध्ये मत्स्यबीज पुरेश्या प्रमाणात टाकण्यात आले नव्हते. यावर्षी महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला असल्याने पाझर तलाव, मध्यम प्रकल्प व धरण शंभर टक्के भरण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. सरकारने तातडीने नियोजन करुन गावातील तळे व मध्यम प्रकल्पात मत्स्यबीज सोडल्यास मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादन होणार आहे.
आदिवासी, मागासवर्गीय व गावातील युवकांना मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होणार आहे. हा रोजगार क्रांतीचा भाग असून, या मत्स्य व्यवसायातून एकूण 40 हजार कोटीचा फायदा होणार असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. महाराष्ट्रात महारोजगार योजना राबविण्यासाठी ऍड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, नामदेव घुले, ओम कदम, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा यांच्यातर्फे करण्यात आली आहे.