सुपा – पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात अद्याप दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने गावोगावी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र छावण्यांची मुदत 1 ऑगस्टला संपणार असून, त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. त्यामुळे मुबलक चारा व पाणी उपलब्ध होईपर्यंत चारा छावण्या सुरूच ठेवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
दुष्काळामुळे चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. या कोरडवाहू पट्ट्यात पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे. गेल्या वर्षी अल्पप्रमाणात पाऊस झाल्याने जनावरांसाठी वर्षभरासाठी लागणारा चारा उपलब्ध न झाल्याने जनावरे घरी नेल्यावर त्यांना चारा म्हणून टाकायचे काय, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
पररिसरात पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने चारा व पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नसल्यामुळे चारा छावण्यांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी भोयरे गांगर्डाचे सरपंच भाऊसाहेब भोगाडे, उपसरपंच दैलतराव गांगड, बाबुर्डीच्या सरपंच आशाताई दिवटे, कडूसच्या सरपंच मीनाताई मुंगसे, रुईछत्रपतीच्या सरपंच मनीषा दिवटे, सरपंच उत्तम पठारे यांनी केली आहे.