मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन
वाठार स्टेशन – मागील शासनाच्या काळात वसना-वांगना या योजनेच्या आराखड्यामध्ये बऱ्याच गावांचा समावेश न झाल्यामुळे वसना सिंचन योजनेचे विस्तारीकरण करून राहिलेल्या इतर गावांचाही या योजनेत सहभाग करून घ्यावा, तसेच शिल्लक अतिरिक्त पाण्याची तरतूद या योजनेसाठी करावी या मागणीसाठी उत्तर कोरेगावमधील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी गिरीश महाजन यांची मुख्यमंत्री विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांतजी भारतीय, खा. रणजित नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली भेट घेऊन या शिल्लक राहिलेल्या गावांनाही पाणी उपलब्ध व्हावे अशी मागणी करण्यात आली.
उत्तर कोरेगावमधील कित्येक वर्षांपासून रखडलेले वसना सिंचन योजनेचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने, मंत्री योगेश सागर यांच्या प्रयत्नाने तात्काळ निधी मिळाल्याने पूर्ण झाले. यामुळे या भागातील बरेच क्षेत्र ओलिताखाली आले. मात्र बऱ्यांचा गावांना या योजनेचे पाणी मिळत नाही तसेच काही गावांच्या खालील बाजूने ही पाईपलाईन गेल्याने उत्तर कोरेगाव मधील बहुतांशी गावे आजही पाण्याअभावी होरपळत आहेत. या गावांना पावसाळ्यातही टॅंकरने पाणी पुरवावे लागते त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट आहे. यामुळे या योजनेचा वास्तर वाढविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी कृष्णा खोरे महामंडळ अभियंता घोगरे यांच्याबरोबरही चर्चा करण्यात आली. भाजप जिल्हा चिटणीस अमित चव्हाण, मनोज कलापट, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष कुमार भोईटे,फलटण तालुका सरचिटणीस सुरेश निंबाळकर, मा. जि. प. सदस्य लोखंडे, माजी पं. स. सदस्य विलास पवार, रासपचे नेते भाऊसाहेब वाघ, हनमंत मांडवे, नामांकित बिल्डर धनाजी मोहिते, सुधीर अडागळे, तडवळे संमत वाघोलीचे युवा नेते शशिकांत धुमाळ, बाळासाहेब देशमुख, सर्कलवाडीचे सरपंच संतोष महांगडे, यशवंत पवार, सचिन ननावरे, शेखर काटकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.