राज्यात शॅडो कॅबिनेट स्थापन करण्यास भाजपला करणार आग्रह
नगर – सरकार दप्तरी अडकलेली सर्वसामान्य नागरिकांची कामे होण्यासाठी सरकार स्थापनेनंतर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात आमदार व प्रतिआमदारांच्या उपस्थितीत लोकशाही जनसुनवाई घेण्याची मागणी पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली आहे.
सरकार कोणाचेही आले तरी सर्वसामान्य नागरिकांचे सरकार दप्तरी अडलेली कामे होत नाही. सर्वसामान्य नागरिक शासकीय कार्यालयात गेल्यास अधिकारी त्यांना जुमानत नाही. निवेदन व केलेला पाठपुरावा फक्त कागदोपत्री होतो. प्रत्यक्षात कामे मात्र होत नाही. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वसामान्यांची कामे होण्यासाठी विधानसभा मतदार संघात आमदार व दोन नंबरची मते मिळवलेल्या प्रतिआमदारांसह सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकशाही जनसुनवाई घेतल्यास अनेक प्रलंबित प्रश्ने मार्गी लागणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
कॉन्टम डेमोक्रसीच्या माध्यमातून नागरिकांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी प्रतिआमदार व शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळ स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. या जनसुनवाईत सर्वसामान्य नागरिक आपले प्रश्न मांडून लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सरकारी अधिकाऱ्यांना ती कामे करुन देण्यास भाग पाडणार असल्याचे ऍड. कारभारी गवळी यांनी सांगितले आहे.