मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉपस्टार रिहानाने ट्विट केले आणि त्यानंतर देशभराचत ट्विटर युद्ध पाहायला मिळालं होतं. रेहानाच्या ट्विटनंतर खेळाडू, बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करत, भारताला विभागण्याचा प्रयत्न होत असून, तसे होऊ देऊ नका असं आवाहन सेलिब्रेटींनी केले होते. या ट्विट संदर्भात चौकशीची मागणी काँग्रेसने केली होती. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्याला काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे.
आम्ही भाजपच्या चौकशीची मागणी केली आहे. सेलिब्रिटींच्या ट्विटची नाही. भाजपची चौकशी केल्यावर सेलिब्रिटींवर कुणाचा दबाव तर नाही ना हे दिसून येईल, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
भारतीय जनता पक्ष जाणिवपूर्वक आम्ही केलेल्या मागणीचा विपर्यास करून बोंब ठोकत आहे. आम्ही भाजपा ची चौकशी करावी अशी मागणी केली आहे, सेलिब्रिटींची नाही. उलट सेलिब्रिटींना भाजपा पासून संरक्षण द्यावे ही मागणी केली आहे. देशपातळीवर भाजपाकडून लोकशाही मानक पायदळी तुडवले जात आहेत.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 8, 2021
सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून शेतकरी आंदोलनावरून सेलिब्रिटींनी केलेले ट्विट एकसारखे असल्याने म्हटले होते. तसेच सेलिब्रिटी कुणाच्या दबावात तर नाही ना ? याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. त्याला गृहमंत्र्यांनी देखील होकार दिला होता. यावरून भाजप आक्रमक झाले होते.
याआधी अनिल देशमुख यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली होती. भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत.पण त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का ? त्या नेत्यांची चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केल्याचे ट्विटमध्ये म्हटले होते.