सातारा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा परिवर्तन संदेश स्वत:च्या लेखणीतून मांडणारे जननायक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना भारतरत्न किताब देण्यात यावा, अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांनी केली. हा किताब दिला नाही तर मतदानावर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा त्यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिला.
भगवान वैराट म्हणाले, “”लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त संघटनेच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांचे मूळगाव वाटेगाव (जि. सांगली) येथून क्रांतीज्योत आंदोलन छेडले आहे. दि. 28 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता वाटेगाव येथे दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांच्या हस्ते व साहित्यिक रतनलाल सोनाग्रा, महाराष्ट्र बहुजन वंचित पक्षाचे नेते लक्ष्मण माने व भगवान वैराट यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले जाणार आहे. वंचित आघाडीने समविचारी पक्षासोबत आघाडी करून सर्व जाती धर्मातील लोकांना सत्तेत सहभागी करावे, असे वैराट यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी सुनीता जाधव, दिलीप कांबळे, बबन गोखले, अशोकराव जाधव, शिवाजी भिसे, श्यामराव खुडे, महावीर पाटोळे, सचिन वायदंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.