नवी दिल्ली – सराकरने विड्यावरील सचित्र धोक्याचा इशारा छापणे बंधनकारक केले आहे. विडी उत्पादकांच्या चाचणी यामुळे वाढणार आहेत. त्यामुळे हा निर्णय सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे.
सरकारच्या या निर्णयाविरोधात 1 सप्टेंबर 2020 पासून या क्षेत्रातील सर्व कामकाज बेमुदत थांबविण्यात येणार आहे. इतर तंबाखूजन्य उत्पादने आणि यात फरक असतो. त्याचबरोबर विड्या हाताने तयार केल्या जातात. यावर लाखो गरीब कामगारांची उपजीविका चालते. याचा कसलाही विचार न करता सरकार सर्वांसाठी समान नियम करते. त्यामुळे हा उद्योग मोडकळीस आला असल्याचे संघाने म्हटले आहे.
यामुळे साडेचार कोटी लोकांचा रोजगार जाणार आहे. सध्या रोजगार निर्मितीची गरज असताना केंद्र सरकार अशा प्रकारचे निर्णय घेऊन रोजगार निर्मितीवर परिणाम करीत आहे. सरकारने अशा प्रकारचे निर्णय अचानक घेताना तारतम्य बाळगण्याची गरज आहे. कामगार, आरोग्य, कृषी, वाणिज्य, वित्त, आदिवासी, गृह, महिला आणि बालकल्याण विभाग, कौशल्य विकास विभाग या सर्वांनी संयुक्तपणे मिळून अशा प्रकारचे निर्णय घेण्याची गरज असते. त्यांची सगळी धोरणे समन्वयाने तयार होत नसल्यामुळे हा व्यवसाय अडचणीत येत आहे.