राज्यात फक्त 0.005 टक्के प्रमाण
मुंबई – डेल्टा प्लस व्हेरिएंट राज्यात जवळपास 7 जिल्ह्यांमध्ये सापडला आहे. आता डेल्टा प्लस काळजीचे कारण झाला आहे. याचा अर्थ त्याचा फैलाव होण्याचा वेग, संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याचा धोकादेखील जास्त असू शकतो. त्याशिवाय शरीरातल्या अँटिबॉडीजचा प्रभाव कमी करण्याचा गुणधर्म डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये पाहायला मिळतो आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राजेश टोपे म्हणाले, राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 21 रुग्ण आहेत. मात्र, त्याचवेळी हा इतक्या गंभीर पातळीवर वाढलेला नाही. आपण प्रत्येक जिल्ह्यातून दर आठवड्याला काही नमुने प्रयोगशाळांना पाठवतो आहोत.
आत्तापर्यंत 3400 नमुन्यांपैकी 21 केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. त्याचे प्रमाण 0.005 असे सापडले आहे. त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरिएंट अजून गंभीर पातळीवर वाढलेला नाही. काळजीचा विषय नसला, तरी त्याचे गुणधर्म मात्र गंभीर आहेत. त्यासाठी या सर्व 21 केसेसचे विलगीकरण आपण करतो आहोत.
त्यांचे निरीक्षण केले जात आहे. त्यांच्या बाबतीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग सविस्तरपणे सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, डेल्टा प्लसचा अभ्यास सुरू आहे. सुदैवाने डेल्टा प्लसमुळे एकही मृत्यू झालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सतर्कतेचा इशारा
कोविड-19 च्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंट म्हणजे प्रकाराबाबत इन्साकॉग- इंडियन सार्स कोवि-2 जीनोम कंसॉर्टीयाच्या अलीकडच्या अध्ययनाच्या आधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांना सावध आणि सजग राहण्याचा सल्ला दिला.