मुंबई – डेल्टा प्लस व्हेरिएंट राज्यात जवळपास 7 जिल्ह्यांमध्ये सापडला आहे. आता डेल्टा प्लस काळजीच कारण झाला आहे. याचा अर्थ त्याचा फैलाव होण्याचा वेग, संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याचा धोका देखील जास्त असू शकतो. त्याशिवाय शरीरातल्या अँटिबॉडीजचा प्रभाव कमी करण्याचा गुणधर्म डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये पाहायला मिळतो आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राजेश टोपे म्हणाले, राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 21 रुग्ण आहेत. मात्र, त्याचवेळी हा इतक्या गंभीर पातळीवर वाढलेला नाही. आपण प्रत्येक जिल्ह्यातून दर आठवड्याला काही नमुने प्रयोगशाळांना पाठवतो आहोत. आत्तापर्यंत 3400 नमुन्यांपैकी 21 केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. त्याचं प्रमाण 0.005 असे सापडले आहे.
त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरिएंट अजून इतक्या गंभीर पातळीवर वाढलेला नाही. काळजीचा विषय नसला, तरी त्याचे गुणधर्म मात्र गंभीर आहेत. त्यासाठी या सर्व 21 केसेसचं विलगीकरण आपण करतो आहोत. त्यांचं निरीक्षण केले जात आहे. त्यांच्या बाबतीत कॉंटॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग सविस्तरपणे सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच, डेल्टा प्लसचा अभ्यास सुरू आहे. सुदैवाने डेल्टा प्लसमुळे एकही मृत्यू झालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.