नवी दिल्ली – दिल्लीत आज पुन्हा लागोपाठ दुसऱ्या दिवशी सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार चकमक झाली. या हिंसाचारात आतापर्यंत हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांच्यासह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 100 हून अधिक जखमी आहेत. मंगळवारी सकाळीही दिल्लीत परिस्थिती तणावपूर्ण आहे. सकाळी पाच मोटारसायकलींना आग लावण्यात आली.
Delhi: Police & Rapid Action Force (RAF) personnel hold flag march in Brahampuri area, after stone-pelting incident between two groups in the area, today morning. #NortheastDelhi pic.twitter.com/NkjrSrmBPD
— ANI (@ANI) February 25, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पहाटेच्या सुमारास मौजपूर आणि आसपासच्या भागात आग लागल्याचे अग्निशमन दलाला 45 फोन आले, ज्यामध्ये एका अग्निशमन इंजिनवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे अग्निशमन इंजिनला आग लागली. यामध्ये तीन फायरमन जखमी झाले आहेत.
तत्पूर्वी, दिल्लीतील तणाव वाढत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेण्यासाठी त्वरित पावलेउचलावीत, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्रालय आणि नायब राज्यपालांना केले आहे. तर परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असून दिल्ली पोलिसांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे नायब राज्यपाल यांनी ट्विटरवर म्हटले आहे. दिल्लीतील मंत्री आणि बाबरपूरचे आमदार गोपाल राय यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. काही लोक जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.