नवी दिल्ली – उत्तर दिल्लीतील अनाज मंडी या इमारतीला लागलेल्या आगीवरून आता राजकीय पक्षांमधील राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजपाने या या घटनेसाठी केजरीवाल सरकारला जबाबदार धरले आहे आणि भाजप मृतांवरून राजकारण करीत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. तर येथील तिन्ही महानगरपालिकांमध्ये सत्ता असलेल्या भाजपा आणि आम आदमी पार्टीवर कॉंग्रेसने टीका केली आहे.
“उपहार थिएटरमधील भीषण आगीमध्ये 59 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 43 जणांचा मृत्यू होण्याची ही दिल्लीतील दुसऱ्या क्रमांकाची मोठी दुर्घटना आहे.’ असे कॉंग्रेसने म्हटले आहे. “आप’सरकार आणि महापालिकांमध्ये सत्ता असलेले भाजपाच या दुर्घटनेला जबाबदार असल्याचे दिल्ली कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शुभाष चोप्रा यांनी सांगितले.
अनाज मंडीमधील आग पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी शॉर्ट सर्किटमुळे लागली होती. या क्षेत्रात अनेक विद्युत वायरी लटकलेल्या होत्या. त्याबाबत अनेकवेळा तक्रार करण्यात आली होती, असे भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटले आहे. तिवारी यांनी भाजपच्यावतीने मृत झालेल्या प्रत्येकाच्या कुटूंबाला 5 लाख आणि जखमींच्या उपचारासाठी 25,000 रुपये जाहीर केले.