आबुधाबी -आयपीएल स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात क्वॉलिफायर दोनमधील लढत होत आहे. दिल्ली कॅपिटल्सने सुरुवातीचे काही सामने सोडले तर अत्यंत सुमार खेळ केला असल्याने याही सामन्यात हैदराबादचेच पारडे जड राहण्याची शक्यता जास्त आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बेंगळुरूला हैदराबादकडून पराभवाचा धक्का बसला व त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दुसरीकडे क्वॉलिफायरच्या पहिल्या सामन्यात त्यांना मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांना क्वॉलिफायर दोनमधील सामना खेळण्याची जरी संधी मिळाली असली तरीही त्यांचे गेल्या सहा सामन्यांतील कतृत्व फारसे समाधानकारक नसल्याने हा सामना जिंकण्यासाटी त्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. त्यातच शुक्रवारी झालेल्या एलिमिनेटरच्या सामन्यात हैदराबादने बेंगळुरूचा पराभव केल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
त्यामुळे त्यांच्या फलंदाजी व गोलंदाजीवर वर्चस्व राखण्याचे दिल्लीसमोर मोठे आव्हान राहणार आहे.
पहिले काही सामने वगळता त्यांच्या पृथ्वी शॉ, शिखर धवन, शेल्डन हेटमायर, ऋषभ पंत, मार्कस स्टोनिस व कर्णधार श्रेयस अय्यर यांना दर्जाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार अय्यरलाही नेतृत्वाची जबाबदारी पेलण्यात अपयश आल्याचेच सिद्ध झाले. तसेच त्यांच्या गोलंदाजांनाही कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही.
त्यांचा सर्वात यशस्वी ठरलेला गोलंदाज कागिसो रबाडा यानेही मुंबई विरुद्धच्या सामन्यात निराशा केली. यंदाच्या स्पर्धेत या सामन्यापूर्वीपर्यंत त्यानेच सर्वाधिक बळी घेतले होते. मात्र, त्याला नंतर वर्चस्व राखता आले नाही. बाकी गोलंदाजात अक्सर पटेल, मार्कस स्टोनिस व अनरिच नोर्जे यांनाही प्रभाव पाडता आलेला नाही.
दुसरीकडे मधल्या फळीतील फलंदाजांना येत असलेले अपयश हैदराबादला सतावत आहे. त्यांची फलंदाजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरपासून सुरू होते व त्याच्याच नावावर संपते. अर्थात बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात केन विल्यम्सन, जेसन होल्डर व मनीष पांडे यांनी जबाबदारीने फलंदाजी केल्याने त्यांना प्ले-ऑफमधून क्वॉलिफायरमध्ये प्रवेश मिळाला. मात्र, तरीही आजचा सामना जिंकायचा असेल तर कर्णधार वॉर्नरवरच त्याची पूर्ण मदार राहणार आहे.
त्याच्यासह वृद्धिमान साहा याच्याकडूनही आक्रमक फलंदाजीची अपेक्षा आहे. दिल्लीपेक्षा हैदराबादची गोलंदाजीही जास्त संतुलित आहे. संदीप शर्मा, जेसन होल्डर व सर्वात भरात असलेला रशीद खान दिल्लीच्या फलंदाजांची डोकेदुखी ठरणार आहे.
विजेत्याला मिळणार केवळ दहा कोटी बीसीसीआयने मार्चमध्येच केली होती घोषणा
आयपीएल स्पर्धेच्या विजेत्या संघाला गेल्या वर्षीपर्यंत 20 कोटी रुपये मिळत होते. यंदा मात्र, 10 कोटी रुपयांवरच समाधान मानावे लागणार आहे. बक्षीस रकमेत निम्मी कपात होणार असल्याचे बीसीसीआयने गेल्या मार्च महिन्यातच जाहीर केले होते.
यंदाच्या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या मंगळवारी होणार आहे. त्यात प्ले-ऑफमधील तसेच अंतिम फेरीत स्थान मिळवणाऱ्या संघांनाही मानधन दिले जाते. विजेता संघ 10 कोटी रकमेचा मानकरी असेल तर, उपविजेता संघ 12.50 कोटींऐवजी यंदा 6.25 कोटी रुपये कमावेल. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघांना 4 कोटी 36 लाख रुपये मिळतील.
रशीद व अश्विन निर्णायक ठरेल
यंदाच्या स्पर्धेत रवीचंद्रन अश्विन याने पहिल्याच स्पेलमध्ये सातत्याने बळी मिळवले आहेत. तसेच त्याने प्रत्येक सामन्यात समोरच्या संघातील बीगफिश फलंदाजांनाच बाद केल्याने दिल्लीला सरस खेळ करता आलेला आहे. मात्र, त्याच्यासह अन्य गोलंदाजांनाही आपल्यावरील जबाबदारी समर्थपणे पेलावी लागणार आहे. दोन्ही संघांचे बलाबल पाहता हैदराबादचा रशीद खान व दिल्लीचा अश्विन यांचीच कामगिरी निर्णायक ठरेल.