वंदना बर्वे
एखाद्या युद्धात ज्या प्रकारे शत्रूच्या कमजोरीवर वार केला जातो अगदी तसाच प्रकार निवडणुकीच्या प्रचारात सुरू आहे. यात आघाडीवर असलेला सत्ताधारी पक्ष अगदी नियोजनबद्ध पद्धतीने विरोधी पक्षांवर वार करीत आहे. निवडणुकीत वार आणि पलटवार असे युद्ध सर्रास दिसते. या निवडणुकीत पूर्वी घडलेल्या घटनाही समोर आल्या हे विशेष. पूर्वी घडलेल्या घटनांसंदर्भात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून मतांसाठी चढाओढ दिसून येत आहे. निवडणुकीचा एवढा नियोजनबद्ध प्रचार यापूर्वी कुणीही बघितला नसावा…!
17 व्या लोकसभेची निवडणूक आता पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. शेवटच्या टप्प्याची निवडणूक पुढच्या रविवारी 19 मे रोजी होणे आहे. यानंतर 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल. यानंतर देशात कोणत्या पक्षाचे सरकार येणार हे स्पष्ट होईल. मात्र, 17 व्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार आतापर्यंतच्या सर्व निवडणुकींपेक्षा खूप वेगळा आहे. प्रत्येक पक्ष जिंकण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरतो. परंतु यासाठी कुणी कालबाह्य गोष्टींचा आधार घेतला नव्हता. या निवडणुकीत मात्र कालबाह्य गोष्टींचा खूप वापर झाला, असे म्हणायला हरकत नाही. याला अपवाद एकच, माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी “गरिबी हटाव’चा नारा दिला होता. परंतु गरिबी काही दूर झाली नाही.
भारतीय जनता पक्षाने प्रत्येक निवडणुकीत कॉंग्रेसच्या या घोषणेची आठवण जनतेला करून दिली. ही एक बाब सोडली तर लोकसभेच्या कोणत्याही निवडणुकीत जुन्या किंवा कालबाह्य गोष्टींचा फारसा उल्लेख केला गेला नाही. 17 व्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने मात्र जुन्या आणि कालबाह्य गोष्टींचा वापर करण्यात कोणतीही उणीव राहू दिली नाही, असे म्हणावे लागेल. थोडक्यात, ही निवडणूक एका निवडणुकीसारखी नव्हे तर युद्धासारखी लढली जात आहे याची जाणीव टप्प्याटप्प्यावर होत आहे. युद्धात ज्या प्रकारे शत्रूच्या कमजोरीवर वार केला जातो तसाच प्रकार या निवडणुकीत घडताना दिसत आहे.
निवडणूक प्रचारात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी आणि शीख दंगलीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसे बघितले तर शीख दंगलीचा मुद्दासुद्धा वेळोवेळी उपस्थित होत आला आहे. परंतु यावेळेस राजीव गांधी यांनाही ओढण्यात आले. दिल्ली, पंजाब आणि हरयाणा येथील निवडणुकीपूर्वी हा वाद निर्माण झाला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर दिल्लीत शीख दंगल उसळली. शेकडो शीख बांधवांची कत्तल करण्यात आली. यावेळेस राजीव गांधी यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. राजीव गांधी यांच्या या वाक्यावरून दिल्लीतील वातावरण तापले आहे. दिल्लीची चावी शीख मतदारांच्या हातात आहे. यामुळे या वादाला जाणीवपूर्वक हवा देण्यात आली. जेणेकरून याचा फायदा दिल्लीसह पंजाब आणि हरयाणामध्येही होईल. याशिवाय, पंतप्रधान असताना राजीव गांधी यांनी “विराट’ या युद्धनौकेचा वापर कुटुंबातील सदस्यांना लक्षद्वीपला सहलीवर नेण्यासाठी केला होता, असाही आरोप झाला. नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांनी हा आरोप चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे.
महत्त्वाचा प्रश्न असा की, पंतप्रधान मोदी राजीव गांधी यांचे नाव वारंवार का घेत आहेत? यामुळे कॉंग्रेस नेत्यांचे पित्त खवळले आहे. कॉंग्रेस प्रवक्त्यांनी मोर्चा सांभाळला आणि पंतप्रधानांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. कॉंग्रेस पक्ष बोफोर्स, आयएनएस आणि विराटबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे. पवन खेडा म्हणाले की, 30 वर्षांपूर्वी राजीव गांधी सहलीसाठी अंदमानला गेले होते, असा मोदी यांनी आरोप केला आहे. व्हाईस ऍडमिरल विनोद पसरिचा यांनी माध्यमांसमोर सांगितले की, राजीव गांधी हे एका अधिकृत दौऱ्यावर होते. ते सहलीसाठी गेले नव्हते. पण मोदींना खरे बोलायचे नाहीये. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाहीये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर होणाऱ्या टीकेमागे विविध कारणे असू शकतात, असे अनेकांना वाटते. एक तर त्यांना लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल प्रचंड आत्मविश्वास असू शकतो. म्हणजे 300 हून अधिक जागा आपण जिंकणार आहोत, असे त्यांना वाटत असावे किंवा दुसरीकडे त्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता असू शकते. या निवडणुकीत आपल्यासाठी अनुकूल स्थिती नाही, त्यामुळे इतर मुद्द्यांवर प्रचार करावा, असे त्यांना वाटत असावे. परंतु पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी संबधित ज्या गोष्टींचा उल्लेख वारंवार आपल्या भाषणातून करीत आहेत त्याचा फायदा भाजपला निवडणुकीत खरेच होणार काय? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जे आरोप मोदी यांच्याकडून होत आहेत ते नवीन नाहीत आणि हे आरोप अनेकदा झाले आहेत. किंबहुना, याच आरोपांमुळे राजीव गांधी यांना 1989 च्या निवडणुकीत पराभवाचे तोंड बघावे लागले होते. अशात 30 वर्षे जुन्या गोष्टी उखरून खरेच काही साध्य होईल काय? याबाबत ठामपणे सांगणे कठीण आहे. याउलट, नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत काय काम केले, हे जनतेसमोर मांडायला पाहिजे आणि त्या आधारावर निवडणूक लढायला पाहिजे, असा कॉंग्रेसचा आरोप आहे.
2014 मध्ये उत्तरप्रदेशात भाजपला जसा प्रतिसाद मिळाला तसा यावेळेस मिळण्याची शक्यता कमी असल्याची जाणीव भाजपला एका सर्वेक्षणातून झाली आहे. याची भरपाई राजीव गांधी यांचे नाव घेऊन करण्याचा प्रयत्न असू शकतो, असेही काही जणांना वाटते. इंदिरा गांधी यांनी 1984 मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार केले होते. याच कारणामुळे त्यांची हत्या करण्यात आली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत दंगल झाली. दिल्ली, पंजाब आणि हरियाणातील शीख मतदारांनी राजीव गांधींचा काळ आठवावा, जेणेकरून त्यांच्या मतावर त्याचा परिणाम होईल, अशी सत्ताधाऱ्यांची खेळी असू शकते.
कारण आजही राजीव गांधींचा काळ आठवला की, शीख समुदायाच्या मनात जुन्या आठवणी ताज्या होतात. पंतप्रधान मोदी राजीव गांधी यांचे नाव याचसाठी घेत असावेत. मजेची बाब म्हणजे, पंतप्रधानांनी राजीव गांधी यांच्यावर केलेल्या आरोपानंतर कॉंग्रेसने संयम पाळला. सुरुवातीला गप्प राहणे पसंत केले. यानंतर प्रवक्त्यांनी सौम्यपणे मोर्चा सांभाळला आणि यानंतर दस्तुरखुद्य कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वढेरा यांनी प्रत्यूत्तर दिले. या भावंडाचे उत्तर टोकदार नव्हते. मात्र, बोलके होते. ते म्हणाले, “मोदी तुमचे कर्म तुमचे वाट पाहत आहेत. तुम्ही कितीही तिरस्काराने बोललात तरी मी तुम्हाला प्रेमाने मिठी मारेल’. सैनिकांच्या नावाने मतदान मागणाऱ्या पंतप्रधानांनी एका इमानदार माणसाचा अपमान केला आहे. तुम्हाला अमेठीची जनताच उत्तर देईल, असे प्रियांका म्हणाल्या. या पलिकडे भाऊ-बहीण किंवा कॉंग्रेस काहीही बोलले नाही, हे जास्त महत्त्वाचे.
राजीव गांधी यांच्या नावाशी काही वाद जोडले गेले आहेत. यामध्ये बोफोर्स प्रकरण, दिल्ली आणि पंजाबमधील हिंसाचार प्रकरण यांचा समावेश होतो. राजीव गांधींचे नाव घेतले की हे वाद पुन्हा उफाळून येतात. त्यामुळे वादापासून दूर राहण्याकरिता कॉंग्रेस राजीव गांधींवरील टीकेला चोख प्रत्युत्तर देत नसावेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते राजीव गांधी यांच्याबाबत का बोलत आहेत याचा खुलासा केला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, त्यांना नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उद्ध्वस्त करायची आहे. देशाच्या पंतप्रधानाची इमेज खराब करण्यासाठी कॉंग्रेस कोणताही चुकीचा मार्ग अनुसरत असेल, तर हा देश माजी पंतप्रधानांबद्दलही बोलेल, असे मी म्हटले, असे मोदी म्हणाले.
काहीही असो! ही निवडणूक आधीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे, असे म्हणावे लागेल. परंतु ज्या गोष्टींचा वापर प्रचारात केला गेला त्याचा फायदा खरेच होईल का? या प्रश्नाचे उत्तर निकालाअंती मिळेलच!