नवी दिल्ली – दिल्लीत सिंघु सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळी दोन पत्रकारांना काल रात्री हरियाना पोलिसांनी अटक केली आहे. त्या अटकेचा विविध संघटनांनी निषेध केला आहे. पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याच्या कारणावरून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मंदिप पुनिया आणि धर्मेंद्र सिंह अशी अटक करण्यात आलेल्या पत्रकारांची नावे आहेत. यातील धर्मेंद्र सिंह यांनी पोलिसांना हमी पत्र लिहून दिल्याने त्यांची रात्रीच सुटका करण्यात आली पण असे हमीपत्र लिहून देण्यास नकार दिल्याने पुनिया यांना मात्र कालच रात्र पोलिस कोठडीतच काढावी लागली आहे.
त्यांना चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पुनिया हे फ्रीलान्स पत्रकार आहेत. ते कारवॉं या नियतकालिकासाठी लेखन करतात. ते शेतकरी आंदोलनाचे समर्थकही मानले जातात.