वंदना बर्वे
प्रियंका गांधी यांनी “लडकी हूँ, लढ सकती हूँ’ हा नवीन नारा बुलंद करीत उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
प्रियंका गांधी यांच्या आश्वासनानुसार कॉंग्रेसनं 40 टक्के महिलांना तिकिटं दिलं; तर याचा अर्थ असा की 403 सदस्यांच्या विधानसभेसाठी 160 महिला उमेदवारांची जंगी फौज यूपी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असेल. मात्र, निवडणूक लढण्याची आणि जिंकण्याची क्षमता असलेल्या महिलांची सेना कॉंग्रेसमध्ये आहे काय? या प्रश्नाचं उत्तर सध्या अनुत्तरीत असलं तरी या डावानं सत्ताधारी भाजपसह विरोधकांची झोप उडविली एवढं नक्की!
राजकारणात राहुल गांधी यांची स्वीकारार्हता वाढविण्यासाठी प्रियंका गांधी जीवाचं रान करीत आहेत. कॉंग्रेसची ताकद यूपीत वाढली तर देशाच्या उर्वरित भागात मुसंडी मारणे कॉंग्रेसला सोयीचं होईल. म्हणून त्यांनी स्वतःला उत्तरप्रदेशच्या राजकारणात झोकून दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी हे प्रियंका गांधी यांच्या निशाण्यावर आहेत.
केंद्र आणि राज्यातील भाजपच्या सरकारला धारेवर धरण्याची जी संधी मिळेल त्याचं सोनं कसं करता येईल याची त्या पुरेपूर काळजी घेत आहेत.
मग ते उन्नावचे प्रकरण असो वा हाथरसचे किंवा लखीमपूरची घटना असो. पीडित लोकांचे अश्रू पुसण्यासाठी प्रियंका गांधी घटनास्थळी गेल्याशिवाय राहत नाहीत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील लोकांच्या मनातील क्रोधाचा उपयोग कॉंग्रेसला कसा होईल? याचा विचार त्या सारख्या करताना दिसत आहेत. कॉंग्रेसच्या महासचिव आणि यूपीच्या प्रभारी प्रियंका गांधी यांचा लूकसुद्धा खूप बदलला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी हिंदुत्ववादी प्रतिमा तयार करण्यासाठी ज्या प्रकारे गुजरातमधील प्रत्येक मंदिराला भेट दिली होती; तसाच लूक प्रियंका गांधी यांनी बनविला आहे. कपाळावर टिळा, डोक्यावर पदर आणि हिंदू देवी-देवतांचे दर्शन घेत त्या लोकांच्या भेटी घेत आहेत.
कॉंग्रेस यूपीत चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून सत्तेच्या बाहेर आहे. अशात प्रियंका गांधी यांनी 40 टक्के महिलांना तिकिटं देण्याची घोषणा करणं मोठ्या धाडसाचं काम आहे. पण यूपीतील नावाजलेल्या महिला कॉंग्रेससोडून दुसऱ्या पक्षांत गेल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर, रिता बहुगणा जोशी आणि अनिता सिंग यांचं देता येईल.
कॉंग्रेसनं 40 टक्के महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्या तर अन्य पक्षांनाही कमी-जास्त प्रमाणात याचे अनुकरण करावे लागेल.
सव्वाशे कोटी भारतात 48 टक्के महिला आहेत. यातही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मागील दोन दशकांपासून मतदान करणाऱ्या महिला मतदारांची संख्या पुरूष मतदारांपेक्षा जास्त आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे. स्वयंपाकाच्या गॅसची किंमत वेगाने वाढतच आहे. पेट्रोल आणि डीझेलच्या किमती दर दिवसाला वाढत असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढतच आहेत. त्यामुळे महिलांचा वर्ग भाजपवर नाराज आहे.
प्रियंका गांधी यांनी ही बाब हेरली असावी म्हणूनच त्यांनी 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा केली असावी. 15 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दिले जाणार आहेत. खरं म्हणजे, उमेदवारी अर्ज जमा करण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंतच होती. मात्र, महिलांना अर्ज करता यावा म्हणून ही मुदत 15 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. जेणेकरून महिलांनी पुढाकार घ्यावा आणि समोर यावे. “जर तुम्हाला बदल हवा असेल तर वाट बघू नका’, असे आवाहनही प्रियंका गांधी यांनी महिलांना केले आहे.
आता कॉंग्रेसला महिला नेत्या किती प्रतिसाद देतात, हे 15 नोव्हेंबरनंतरच स्पष्ट होऊ शकेल. परंतु, प्रियंका गांधी स्वतः निवडणूक लढणार काय? हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. त्या लढणार नसतील तर कॉंग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? याची उत्सुकताही लागून आहे. एकंदरीत काय तर, महिला उमेदवारांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे विधानसभेचे चित्रसुद्धा बदलेल. सध्या यूपीच्या विधानसभेत फक्त 11 टक्के महिला आमदार आहेत.
यूपीच्या 14.61 कोटी मतदारांपैकी 6.70 कोटी मतदार महिला आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीचा कल पाहिला तर, उत्तर प्रदेशातील एक तृतीयांशपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांपेक्षा जास्त होती. विशेषतः बुंदेलखंड, पश्चिम आणि पूर्वांचलच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांनी मतदानामध्ये अधिक सहभाग घेतला.
याचा सर्वाधिक फायदा भाजपला झाला. असे असतानाही भाजपसह सर्वच राजकीय पक्षांकडून तिकीट मिळविण्यात महिलांची पिछेहाट झाली आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 46 महिलांना, सपाने 34, बसपाने 21 आणि कॉंग्रेसने 12 तिकिटे दिली होती. त्यापैकी 41 महिला आमदार होऊ शकल्या. यापैकी केवळ चार जणी मंत्री होऊ शकल्या. यात एकही कॅबिनेट मंत्री नाही, हे येथे उल्लेखनीय. कॉंग्रेसकडेही दोन महिला आमदार आहेत, त्यापैकी एक भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.