आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल दिल्लीच्या सिंहासनावर पुन्हा एकदा बसण्याची तयारी करीत आहेत. तर, गृहमंत्री अमित शहा यांचा भाजप आणि सोनिया गांधी यांचा कॉंग्रेस पक्ष केजरीवाल यांना खिंडित गाठण्याच्या तयारीत आहेत.
केजरीवाल यांनी पाणी आणि वीज फ्री करून दोन्ही पक्षांच्या पायाखालची जमीन सरकवली होती. आता हाच डाव त्यांच्यावर उलटविण्याची तयारी करीत आहेत. यासाठी दोन्ही पक्ष कपोलशंखाप्रमाणे मतदारांना आश्वासन देत आहेत. कपोलशंखाचं वैशिष्ट्य असं की, आपण त्याला दहा रुपये मागितले तर तो वीस रुपये मागायला सांगतो. देत काहीच नाही. फक्त दुप्पट आश्वासन देतो.
सध्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत हाच प्रकार दिसून येत आहे. 2015 मध्ये सत्तेवर येताच केजरीवाल यांनी दोनशे युनिट वीज फ्री दिली होती. हा डाव उलटविण्यासाठी भाजपने एक हजार युनिट वीज फ्री देण्याची घोषणा केली आहे. एवढंच नव्हे तर केजरीवाल जे काही देतील आम्ही त्याच्या दहा पट फ्री देऊ, असं आमिष भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी अलिकडेच दिले होते. यात कॉंग्रेसही मागे नाही. कॉंग्रेसने कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी मेट्रोचा प्रवास फ्री करण्याची घोषणा केली आहे.
आप, भाजप आणि कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्यात व्यस्त आहेत. महत्त्वाचे म्हणजे, यात एकापेक्षा एक सरस आश्वासनांचा समावेश केला जात असल्याचे समजते. यासाठी तिन्ही पक्षांनी तज्ज्ञांची सेवा घेतली आहे. सात टाउन हॉल मिटींग आणि जनसंवाद कार्यक्रमामध्ये लोकांच्या सूचना आणि तज्ज्ञांशी सल्ला मसलत करून केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आपला जाहीरनामा तयार करीत आहे. यात मुख्य दहा समस्यांवर फोकस आहे. “पिछले काम रहेंगे जारी, नये काम की हैं तयारी’ या थीमवर आपचा मेनिफेस्टो तयार होत आहे. नि:शुल्क वीज आणि पाणी, शिक्षण, आरोग्य, तिर्थयात्रा आणि महिलांना बसचा फ्री प्रवास पुढील पाच वर्षांपर्यंत कायम ठेवण्याची घोषणा केजरीवाल यांनी आधीच केली आहे. यात आणखी सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी प्रमुख राहणार आहे.
आपनुसार, मागील पाच वर्षांत पाइपलाइनच्या माध्यमातून घरोघरी पाणी पोहचविण्याचे काम करण्यात आले आहे. आता पुढील पाच वर्षांत 24 तास पाणी देण्याचे लक्ष्य आहे. दिल्लीला जगातील सर्वात सुंदर शहर बनविणे आणि जागतिक दर्जाचे रस्ते बनविण्याचे लक्ष्य आहे. 2015 मध्ये आपने 70 आश्वासने दिली होती. यातील सर्व आश्वासनांची पुर्तता सरकारने केली असल्याचा दावा केला जात आहे. आपने जाहीरनामा तयार करण्यासाठी तीन सदस्यांची समिती बनविण्यात आली आहे. टाउन हॉल मिटींग, मोहल्ला सभा, घरोघरी केलेले कॅंपेन आणि बुथ संवाद आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षाला बऱ्याच सूचना मिळाल्या आहेत. याचा समावेश जाहिरनाम्यात राहण्याची शक्यता आहे. 15 ते 20 जानेवारी दरम्यान आपकडून मेनिफेस्टो जारी केला जाऊ शकतो.
केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला सत्तेतून बेदखल करण्यासाठी भाजप जादुई जाहीरनामा तयार करण्याच्या कामात गुंतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनविण्यात आली असून या समितीचे सदस्य वेगवेगळे मुद्दे शोधून काढत आहेत. महत्त्वाचं म्हणजे, यात केजरीवाल यांचा पक्ष सोडून आलेल्या नेत्यांचाही समावेश आहे. आपने निशुल्क वीज आणि पाणी देऊन भाजपची पंचाईत केली आहे. भाजप यावर उतारा शोधत आहे. आता भाजप यावर कोणता उपाय शोधून काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागू आहे. निशुल्क विजेचा फायदा किती लोकांना झाला आणि त्यावर किती खर्च आला याची शहानिशा केली जात आहे.
दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी अलीकडेच स्पष्ट केले होते की केजरीवाल यांच्या सरकारने जेवढी वीज फ्री दिली आहे; भाजपचे सरकार आल्यास पाच पट जास्त वीज निशुल्क दिली जाईल. केजरीवाल यांनी दरमहा वीस हजार लीटर पाणी फ्री दिले आहे. मात्र, बऱ्याच भागात पाइपलाइन नाही. अशात, फ्री पाण्याचा फायदा कुणाला झाला? असा प्रश्न आणि त्यावर उतारा दिला जाऊ शकतो. यमुना नदी स्वच्छ करण्याचा मुद्द्यावरही भाजप फोकस करीत आहे.
साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर यमुनेचा विकास करण्याचा संकल्प भाजपकडून सोडला जाऊ शकतो. यमुनेच्या काठावर पर्यटन आणि पाण्यापासून वीज निर्मिती केली जाण्याची घोषणासुद्धा जाहीरनाम्यात असू शकते. महत्त्वाचे म्हणजे, वजीराबाद आणि ओखलाजवळ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भव्य प्रतिमा उभारण्याच्या योजनेवरही भाजप काम करीत आहे. याच ठिकाणी मोठी बाग निर्माण केली जाऊ शकते. केजरीवाल यांनी महिलांना बसमध्ये फ्री प्रवासाची सोय करून दिली आहे. भाजप यात दोन पावलं समोर जाऊन विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना फ्री प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्याचा विचार करीत आहे.
– वंदना बर्वे