– वंदना बर्वे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आपलं एकदम “खास’ आहे. वन-टू-वन आहे आणि डायरेक्ट एंट्री आहे, असं ज्या मंडळींना आतापर्यंत वाटत होतं त्या सर्वांची डोळे उघडले असतील, असं मानायला हरकत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये अलीकडेच केलेल्या प्रयोगाने देशाचे लक्ष वेधून घेतले. भाजपनं गुजरातसारख्या राज्याची धुरा पहिल्यांदाच निवडून आलेले भूपेंद्र पटेल यांच्या हाती देणं, हा खरंच खूप मोठा धाडसी निर्णय आहे. एवढंच नव्हे तर, मंत्रिमंडळातही अशाच सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांना मंत्रिपदाचा अनुभव नाही. अर्थात, गुजरातच्या मंत्रिमंडळात एकही अनुभवी मंत्री नाही.
नरेंद्र मोदी यांनी हा प्रयोग करून देशाला दाखवून दिले आहे की, केवळ त्यांची छातीच 56 इंचाची नाही तर काळीजही वाघाचं आहे. भाजपातील नेते मंडळीही या प्रयोगाची निंदा करतील. मात्र, उघडपणे या निर्णयाला विरोध करण्याचं धाडस एकाच्याही अंगात नाही. गुजरातमधील नेत्यांचे पित्त खवळले नसेल असं नक्कीच नाही. पण, कोणी अद्याप बोललेले नाही.
एकेकाळी असं म्हटलं जायचं की, 545 सदस्यांच्या भारताच्या संसदेत फक्त एक पुरुष होता आणि तो म्हणजे इंदिरा गांधी. आता हीच बाब नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलली जाऊ शकते. कॉंग्रेससह तमाम विरोधी पक्षांनी सकारात्मक विचार करून मोदी यांच्या या नेतृत्व गुणांपासून धडा घ्यायला पाहिजे.
भाजपनं तमाम जुने नेते आणि मंत्र्यांना घरी बसविलं आहे. मात्र, कुणीही कुरकुर केली नाही. याउलट कॉंग्रेस पक्षाचं उदाहरण देता येईल. मुख्यमंत्री का बनविलं जात नाही म्हणून उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी कॉंग्रेसच्या नाकीनऊ आणले. ज्योतिरादित्य शिंदे कॉंग्रेस सोडून भाजपात गेले आणि मंत्री झाले. माजी राज्यमंत्री जितीन प्रसाद, आरपीएन सिंग पक्ष सोडून गेले. माजी मंत्री गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांच्या देखरेखीखाली जी-23 गटाच्या नेत्यांनी कॉंग्रेसला वेठीस धरले. ही बाब कॉंग्रेसने लक्षात घेण्यासारखी आहे.
आणखी महत्त्वाचा मुद्दा असा की, राज्य चालविण्याचा कोणताही अनुभव नसताना मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि त्यांचे सहकारी गुजरातच्या विकासाचा वेग कसा काय कायम ठेवू शकतील? हाच प्रश्न मोदी आणि शहा यांना विजय रूपाणी यांचा राजीनामा घेण्यापूर्वी पडला असेल आणि त्यांनी या प्रश्नाचे उत्तरही शोधून काढले असेल, यात शंका नाही. जुन्या आणि अनुभवी मंत्र्यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान का देण्यात आले नाही? याचं नेमकं उत्तर मोदी आणि शहा हेच देऊ शकतील.
2014 च्या निवडणुकीत पंतप्रधानांनी अमेठीची जबाबदारी विद्यमान मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे सोपविली होती. इराणी पराभूत झाल्या. पण रणांगण गाजविले. यामुळे मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयासारखं खातं देण्यात आलं. परंतु, पुढच्या विस्तारात हे खातं काढून वस्त्रोद्योग खातं देण्यात आलं. प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद आणि डॉ. हर्ष वर्धन यांच्यासारख्या दिग्गज मंत्र्यांना पक्षाने घरी बसविल्याचं उदाहरणही ताजं आहे. यामुळे, महाराष्ट्रासह देशभरातील भाजपच्या नेत्यांना गुजरातच्या निर्णयाकडे सावधगिरीचा इशारा या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे.
गॅस नको चूल हवी!
उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसच्या एका आमदारामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची द्विधामनःस्थिती झाली आहे. कॉंग्रेसचे दीपक सिंग अलीकडेच विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. योगी सरकारने त्यांना बंगलासुद्धा दिला आहे. परंतु, या बंगल्यात प्रवेश करण्यासाठी त्यांनी प्रशासनापुढे एक अट ठेवली आहे. त्यांच्या मते, देशात गॅस सिलिंडरच्या किमती फार वाढल्या आहेत. त्यामुळे या बंगल्यात त्यांच्यासाठी गॅसऐवजी मातीच्या चुलीची व्यवस्था करावी, अशी त्यांची मागणी आहे.
दीपक सिंग यांच्या पत्रानुसार, 2024 च्या निवडणुकीपूर्वी गॅसच्या किमती कमी होण्याची शक्यता नाही. एक सिलिंडर 975 रुपयाला मिळत आहे. एका महिन्यात त्यांना दोन सिलिंडरची गरज पडणार आहे. परंतु, दोन सिलिंडर खरेदी करणे आपल्याला शक्य होणार नाही. यामुळे, मातीच्या चुलीची व्यवस्था करण्यात यावी. काही रुपयांच्या लाकडांमध्ये पूर्ण महिनाभर स्वयंपाक होईल आणि ते परवडण्यासारखे आहे. म्हणून मातीची चूल हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता, योगी प्रशासनाला काय करावे आणि काय करू नये, असं झालं आहे.
कन्हैय्याकुमार राहुल गांधींच्या भेटीला
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार अलीकडेच राहुल गांधी यांना भेटायला गेले होते. अर्थातच, कन्हैय्या कुमार कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तत्पूर्वी, काही मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका आणि कॉंग्रेसची भूमिका समजून घेण्यासाठीच ते गेले होते. कन्हैय्या कुमार तरुणांमध्ये फेमस आहेत. त्यांचा यूपी आणि बिहारमध्ये पक्षाला फायदा होईल, असं कॉंग्रेसला वाटत आहे.