नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रया दिली आहे. अमित शहा म्हणाले की, ‘गोली मारो’ आणि ‘भारत-पाक सामना’ यासारख्या विधाने भाजप नेत्यांना टाळायला हवे होते. पक्ष अशा प्रकारच्या वक्तव्यांपासून स्वत: ला दूर ठेवतो. पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या द्वेषपूर्ण विधानांमुळे निवडणुकीत भाजपाला त्रास सहन करावा लागला.
आम्ही निवडणुका केवळ जिंकण्यासाठी किंवा पराभूत करण्यासाठी लढत नाही. भाजपा हा एक विचारधारेवर आधारित पक्ष आहे, आमच्यासाठी निवडणुका देखील आपली विचारधारा वाढवण्याच्या निवडणुका आहेत. आम्ही फक्त जय पराभवासाठी निवडणूक लढवत नाही. तसेच दिल्ली निवडणुकांबाबत माझे मूल्यांकन चुकीचे असल्याचे सिद्ध झाले असल्याचे शहा यांनी सांगितले.
दिल्लीतील निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘गोली मारो’ असे विधान केले होते, तर ‘भारत-पाकिस्तान सामना’ हे विधान आम आदमी पार्टीमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या कपिल मिश्रा यांचे होते. रीठाला येथील भाजपा उमेदवार मनीष चौधरी यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेत अनुराग ठाकूर यांनी निवडणुकीच्या मेळाव्यात लोकांना ”गद्दारों को गोली मारने वाला” चिथावणीखोर उक्तीसाठी भडकवले होते. या विधानासंदर्भात निवडणूक आयोगाने अनुराग ठाकूर यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.