नवी दिल्ली – राजधानी दिल्लीला काल रात्रीपासून झालेल्या तुफानी पावसाने चांगलेच झोडपले. सगळीकडे मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते त्यामुळे नागरीकांची दैना उडाली. विमानतळावरही मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने हवाई वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम झाला. मोतीबाग, आर के पुरम, मधु विहार, हरीनगर, रोहटक रोड, बदरपुर, सोम विहार, रिंगरोड, विकास मार्ग, संगम विहार, मेहरौली-बदरपुर रोड, पुल प्रल्हादपुर, मुर्निका, राजपुर खुर्द, नांगलोई, या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने वाहतूक खोळंबली होती.
एकीकडे रस्त्यावर गाडयांच्या लांबचलाब रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे अतिपावसामुळे मेट्रो लाईन देखील बराच वेळ ठप्प होती. आयटीओ पासून तर हजरत निजामुद्दीन पर्यंत रस्त्यावर दुतर्फा गाडयांच्या रांगा लागल्या होत्या. तर जनकपुरी, गुडगाव, राजोरी गार्डन, धोला कुंवासह अनेक भागात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे दिल्लीकरांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला.
यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक जण नाराजी व्यक्त करताना दिसत होते. शिवाय अतिशय पॉश परिसर समजला जाणारा लोधी गार्डन भागात देखील पाणी साचले होते. महत्वाचे म्हणजे या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या भागात बहुतांश खासदाराचे वास्तव्य आहे, हे विशेष. या भागात देखील अनेक खासदाराच्या घरात पाणी साचले होते. दिल्लीतील काही भागात गारा देखील पडल्या आहेत. यामुळे दिल्लीकरांचं सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे.
लोकांनी सोशल मिडीयावर साठलेल्या पाण्याचे व खोळंबलेल्या वाहतुकीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात प्रसारीत केले. रस्त्यावर जागोजागी अनेक वाहने बंद पडलेली दिसून आली. अनेक ठिकाणी बसेसही बंद पडल्या होत्या. साठलेले पाणी दूर करण्यासाठी सरकारी यंत्रणांची मोठीच तारांबळ उडाली. दिल्ली पोलिसांच्या वाहतूक विभागानेही पाणी साठल्यामुळे जे रस्ते वाहतुकीला अयोग्य झाले होते त्याची माहिती नागरीकांसाठी व्यापक प्रमाणात जारी केली.
दिल्लीला मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानेही जारी केला होता. त्यामुळे त्यांनी ऑरेंज ऍलर्टही जारी केला होता.