मुंबई : केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात वर्षभर दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. याबाबत भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांनी नाही तर खलिस्तानी आणि देशद्रोहींनी केलं होतं, असे वादग्रस्त वक्तव्य लोणीकरांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या नावाने खलिस्तानी लोकांनी तलवारी घेऊन आंदोलन केले होते. त्यावेळी कमांडोंनी जर गोळ्या घातल्या असत्या तर, विरोधक बोलायला मोकळे झाले असते की, शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या. पण केंद्र सरकारनं हे प्रकरण संयमाने हाताळल्याचे लोणीकर म्हणाले. ते
जालना जिल्ह्यातील परतूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कायदे शेतकरी हिताचेच होते, असे बबनराव लोणीकर म्हणाले आहेत. परंतु, या कायद्यांना शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. या कायद्यांच्या विरोधात वर्षभर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन केले होते. जोपर्यंत कायदे रद्द केले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली होती. त्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतल्याचे स्पष्ट केले होते.
दरम्यान, भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी, ‘कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलन शेतकऱ्यांनी नाही तर खलिस्तानी आणि देशद्रोही लोकांनी केल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यावेळी मिल्ट्री आणि कमांडोने आंदोलकांवर गोळ्या घातल्या असत्या. पण… शेतकऱ्यांचं हत्याकांड झालं, असे विरोधक बोलायला मोकळे झाले असते, असेही लोणीकर म्हणाले.
केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात एका राज्यानं म्हणजेच, पंजाबने आंदोलन केले. पंजाबच्या शेतकऱ्यांच्या नावाखाली खलिस्तानी लोकांनी आंदोलन केलं. खलिस्तानी म्हणजे, देशद्रोही असलेल्या संघटनेनं आंदोलन केल्याचे लोणीकर म्हणाले. तलवारी घेऊन आंदोलन केलं. तलवारी घेऊन हे लाल किल्ल्यावर गेले. तिथे जाऊन यांनी खलिस्तानचा झेंडा फडकावला. कंमांडोंनी जर गोळ्या घातल्या असत्या तर विरोधक बोलायला मोकळे झाले असते की, शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या. पण केंद्र सरकारनं हे प्रकरण संयमाने हाताळल्याचे लोणीकर म्हणाले. कृषी कायद्याने शेतखऱ्यांना त्यांचा माल कुठेही विकण्याचे स्वतंत्र होतं, असेही लोणीकर म्हणाले.