पुणे – राज्य शासनातील प्रत्येक विभागाने 30 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) रिक्त पदांची मागणीपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र अद्यापही एकाही विभागाने मागणीपत्र सादर केली नसल्याचे दिसून येत आहे.
या प्रशासकीय दिरंगाईचा हजारो उमेदवारांना फटका बसणार आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची मागणी युवा सेनेचे कल्पेश यादव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 6 जुलै 2021 रोजी विधानसभेत एमपीएससीमार्फत 15 हजार 511 पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर 30 जुलै 2021 वित्त विभाग शासन निर्णयानुसार प्रत्येक विभागाने 30 सप्टेंबर 2021 आयोगाकडे रिक्त पदांची मागणीपत्रे पाठवावीत असे निर्देश देण्यात आले होते.
या पदभरतीकडे लाखो तरुणांचे लक्ष आहे. पण प्रशासकीय दिरंगाई मुळे अद्याप एका ही विभागाने मागणीपत्र सादर न केल्याचे समोर आले आहे. याबाबत मी तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याचे यादव यांनी सांगितले.