नवी दिल्ली, दि. 18 – फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांना भारतात आणण्यासाठी सर्व पावले उचलली जात आहेत. मात्र यात तेथील जटील कायदेशीर प्रक्रियेच्या मुद्द्यामुळे त्याला आणण्यात विलंब होत असल्याचे केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
भारतातील बॅंकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून मल्ल्या इंग्लंडमध्ये फरार झाला आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायलयात न्या. यु. यु. ललीत आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे त्याची सुनावणी सुरू आहे. पुढील सुनावणी 15 मार्चला ठेवण्यात आली आहे.
इंग्लंडमधून मल्ल्या यांच्या हस्तांतरणाच्या स्थिततीबाबतची माहिती देणारे पररराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी देवेश उत्तम यांचे पत्र सॉलीसिटर जनरल तुषार मेहता यांनी सादर केले. ते दाखल करून घेत मेहता यांना मल्ल्या हस्तांतरणाच्या सद्य स्थितीचा अहवाल देण्यास मुदतवाढ देण्यात आली. मेहता म्हणाले, मल्ल्या यांच्या हस्तांतरणाचा मुद्दा पररराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने इंग्लंड सरकारकडे उपस्थित केला आहे. मल्ल्याच्या हस्तांतरणासाठी केंद्र सरकार सर्व ते प्रयत्न करत आहे. राजनैतिक ते प्रशासकीय सर्व पातळीवर सर्व बाजूने हा मुद्दा वारंवार तपासला जात आहे.