सुख! सुख! सुख! सर्व बाजूंनी सुखाचा नुसता पाऊस! सुखाचा म्हणजे सुखी असल्याच्या आभासाचा! कारण समाधानाचा तरंग अंतरंगापर्यंत पोचण्याआधीच सुखाचं नवं रूप नव्या ढंगात निमंत्रण देतच असतं. मग ते पूर्ण करण्यासाठी आटापिटा. आपण जे सोसलं ते आपल्या पुढच्या पिढीला अगदी काहीही सोसावं लागू नये म्हणून बिचारी धावाधाव! एखाद्या गोष्टीची अधीरतेनं वाट पाहणं, तिच्या अनिश्चिततेबद्दल झोके अनुभवणं… अनपेक्षिततेच्या काठावर जीवाचं काहूर उठणं आणि प्रतीक्षा मिसळलेल्या अश्रूंमध्ये सुखाचं अवचित येणं यातली गंमत ही केवढी मजेशीर श्रीमंती असं हे सांगणं आवाक्याबाहेरचं आहे. आता दिवाळीआधीच करंजी, होळीआधीच कुठेही पुरणपोळी मोहोर येण्याआधीच ताजा आमरस गल्लोगल्ली कुठेही हात जोडून तयार असतो. त्या त्या सणाची, रुचीची, गंधाची वाटच पाहावी लागत नाही. सगळं कसं रेडिमेड! वस्तूंबाबतचं जे तेच भावनांबाबत.
पटकन कुणाशीही संवाद कधीही, कुठेही. आवडतं गाणंही व्याकूळ न करता एका बटनात कानात गुंजतंय. यातून अंत:करणाचे तगमग संघर्ष हरपले अन् त्याचा गंधही! तीच मानसिकता नव्या पालकांची. मुलांच्या भविष्यातील सारा जीवनसंघर्ष आततायी प्रेमानं पालकांनीच संपवून टाकणं यासारखा दुसरा कुठला गुन्हा असेल असं वाटत नाही. भविष्याची काळजी याचा अर्थ जगण्याचा गड चढण्याचे त्याचे मार्ग आपणच चढणं, हा नाही. रानवाटांचा अनवटपणा, खडकांचा रांगडेपणा आणि मधूनच वाहणाऱ्या निर्झरणीची शीतलता त्याला कळणार कशी? अतिदारिद्य्राने काही पिढ्या संपल्या, आता अति ऐश्वर्याचं नवंच दारिद्य्र दारात आलंय. ते दारिद्य्र प्रयत्नानं संपवता तरी येत होतं, हे रत्नजडीत दारिद्य्र लाखो आयुष्याचा उष्ण कोवळा घास घेऊन संपणार, असं दिसतंय. केवळ लग्न झालं अन् मूल झालं म्हणून पालक झालो, असं समजणाऱ्या कोट्यवधी घरांत पुढे जिद्द हरवलेल्या तरुणाईचं मन ही मोठीच समस्या असणार आहे. अतिसुखाच्या ओल्या दुष्काळाचं सावट वेळीच कळलं तर अनेक घरांत मागितलं की द्या! हा एककलमी कार्यक्रम असतो आणि मग ते नाही मिळालं की क्रौर्य कुठल्या थराला जाईल याचा नेम नसतो.
ना घरात प्रार्थना! ना घरात एखाद्या सामाजिक सेवेची साधना! ना घरात ग्रंथवाचन! ना पुस्तकाचं समृद्ध कपाट! ना व्याख्यानांना जाणं! ना उत्तम संगीत! फक्त संगणक, मोबाइल, व्हॉट्सऍप ते एसएमएस आणि रस्त्याच्या कडेला उभं राहून खाणं आणि हीसुद्धा नशा कमी म्हणून की काय, मैत्रीची सरहद्द ओलांडणाऱ्या मजेनं सर्वनाशाची पूर्वतयारी करणं! जीवनाची ओढ नाही म्हणून मरणाचं भय नाही! जगलो काय न् मेलो काय, इतका बेफिकीरपणा वाढत चालला आहे. आधी प्रतिष्ठापना हवी सुसंस्कृततेची, मानव्याची! संपूर्ण विकसित माणूसपणाची! कुणी तरी टाळी वाजवल्यावर हजर ठेवतं ते उधार उसनवारीचं सुख म्हणजे सुख नाही. पंखातलं बळ संपवून पाखराला आयतं डाळींब मिळण्यात कुठलं आलय सुख! आभाळ पाठीवर घेऊन भरारीची दमछाक मिरवीत धुंडून जे फळ मिळतं तेच फळ! दुसऱ्यानं आपल्यासाठी ठेवलेलं ते निष्फळ! मिळण्यातल्या आनंदापेक्षा मिळवण्यातल्या धडपडीतली गंमत कळणं आवश्यक आहे. योग्य वयातच जीवनाचं प्रकाशात्मक उद्दिष्ट निश्चित करणं, ही खरी जीवनसाधना आहे. चाललंय आपलं कटलेल्या पतंगीसारखं! त्यानं फार तर वयाचे वाढदिवस सेलिब्रेट होतील, कर्तृत्वाचे वाढदिवस साजरे होणार नाहीत.
महाकवी कुसुमाग्रजांचा कोलंबस म्हणतो, कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती! खरंच आहे, ट्रेनच्या गर्दीत जा, बाजारात जा, सिनेमाला जा, बसमध्ये चढा, कुठेही जा, लाखो माणसं नुसती गच्च गर्दीने जगतच असतात; पण त्यातले काही चेहरे पोट भरण्याच्या आनंदापलीकडे सुंदर जीवनाची पाऊलवाट चोखाळतात. कुणी प्रयोगशील शेतकरी, कुणी ध्यासवंत शास्त्रज्ञ, कुणी भारतमातेला सार्थक वाटेल असा सैनिक, कुणी मन उगाळून मन उजळणारा शिक्षक, कुणी अनाथ मुलांसाठी स्वप्नांची आहुती देणारा सेवक… असाच चेहरा वेधक ठरतो, तो गर्दीत असूनही वेगळा ठरतो. कोट्यवधी पोटार्थी किड्यामकोड्यांप्रमाणे जगायचं की वाटेवरची सर्व वादळविजांची आव्हाने झेलत संपत्ती सुखापलीकडची ध्यासाची नक्षत्रमाला उजळायची, हे ठरवणारी जिद्द मनात सुखाची परिभाषा शिकवून जाते.
प्रा. भगवान गावित