नारायणगाव (अतुल कांकरिया) – जुन्नर तालुक्यातील महत्वाचे व आर्थिक उत्पन्नाचे पीक समजले जाणाऱ्या टोमॅटोला यंदा करोनामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. महाराष्ट्रात टोमॅटोचे मुख्य मार्केट म्हणून जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. नारायणगाव येथील बाजार समितीच्या उपबाजार केंद्रात टोमॅटो, कोथिंबीर, मेथी हे मुख्य भाजीपाल्याची मोठी उलाढाल होते. नारायणगाव बाजार समितीला टोमॅटो, मेथी, कोथिंबीर आदी विभागात 8 कोटी रुपयांची झळ बसली आहे. तसेच पूरक घटकांवर एक कोटी रुपयांचे आर्थिक आरिष्ट कोसळले आहे.
जुन्नर तालुक्यात प्रामुख्याने टोमॅटो पीक घेतले जाते. हे टोमॅटो देशातील विविध राज्यात नारायणगाव मार्केटमधून पाठविले जातात. मार्चपासून टोमॅटो हंगामाला सुरुवात होते. यंदा करोनाच्या संकटाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. एप्रिल 2019 पासून ते मार्च 2020 पर्यंत उपबाजार केंद्रातून 4 कोटी 86 लाख 9 हजार 590 टोमॅटो क्रेटची आवक होऊन 173 कोटी 34 लाख 3 हजारची सरासरी आर्थिक उलाढाल झाली होती.
दरम्यान 40 ते 600 पर्यंत बाजारभाव होता. कोथिंबीरची एप्रिल 2019 ते मार्च 2020 पर्यंत 45 कोटी 16 लाख 7 हजार 200 जुड्यांची अवाक झाली. यादरम्यान शेकडा 200 ते 7 हजार रुपये बाजारभाव होता. मेथीची 31 कोटी 40 लाख 5 हजार 200 जुड्यांची आवक झाली. शेकडा 200 ते 3 हजार 800 रुपये बाजारभाव होता. शेपूची 9 कोटी 29 लाख 3 हजार 600 आवक झाली.
शेकडा 200 ते 2 हजार 400 रुपये बाजारभाव होता. मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे भाजीपाला मुंबई व पुणे येथे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे शेतीमाल तालुक्याबाहेर जात नसल्याने तो फेकून देण्याची वेळ आली आहे. काही शेतकऱ्यांनी उभे पीक सोडून दिले आहे. मागणी नसल्याने तोटा सहन करावा लागत आहे. 3 ते 4 दिवसांत टोमॅटोची अवाक सुरू झाली आहे. (दि. 6) 7 हजार क्रेटची आवक झाली. त्यावेळी 50 ते 130 रुपये 20 किलो क्रेटला बाजारभाव होता.
टोमॅटो व्यापारी दत्ता शिंगोटे म्हणाले की, सध्या करोनामुळे जुन्नर, आंबेगाव, पारनेर, खेड तालुक्यांतून सध्या 10/57 व विराण जातीच्या टोमॅटोची आवक सुरू आहे. यातील काही टोमॅटो सॉससाठी काही कंपन्यांना पाठविला जात आहे. गुजरात, उत्तरप्रदेश राज्यात सध्या टोमॅटो पाठविले जात आहेत.
शेतकरी व व्यापारी यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणजे अडतदार यांचे सुमारे 10 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजार समितीला टोमॅटोच्या उलाढालीतून टॅक्सच्या माध्यमातून सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती बाजार समितीचे संचालक विपुल फुलसुंदर यांनी दिली.