सोलान- पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारसाठी संरक्षण व्यवहार म्हणजे “एटीएम’ होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. हिमाचल प्रदेशातील सोलान येथे प्रचारसभेमध्ये बोलताना त्यांनी भारत स्वातंत्र्यानंतरची 70 वर्षे संरक्षण सामुग्रीच्या उत्पादनाबाबत परावलंबी राहिला त्याला कॉंग्रेस सरकार जबाबदार होते. संरक्षण साहित्याबाबत देशाला जाणीवपूर्वक परावलंबी ठेवण्याचे कारण हे व्यवहार म्हणजे कॉंग्रेससाठी “एटीएम’ असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला.
मुख्यमंत्री ठाकूर यांचे कौतुक
अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोची जेवडी लोकसंख्या आहे त्यापेक्षाही जास्त आयुष्मान भारत या आरोग्यसेवा योजनेमध्ये लाभार्थी आहेत. जवळपास 50 कोटी भारतीयांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय सुविधा आयुष्मान भारत योजनेद्वारे दिल्या जात आहेत. पंतप्रधान किसान योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल मोदींनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांचे कौतुकही केले.
देशाला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा भारताला संरक्षण उत्पादनांचा 150 वर्षांचा दीर्घ अनुभव होता. त्याकाळी चीनलाही तसा कोणताही अनुभव नव्हता. मात्र आता चीनकडून संरक्षण साहित्याची निर्यात होते आहे. तर दुसरीकडे आपण अजूनही संरक्षण सामुग्रीची आयात करतो आहोत. पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारच्या चुकीचा धोरणांमुळेच असे झाले. भाजपने गेल्या पाच वर्षात हे धोरण बदलण्याचा प्रयत्न केला आणि देशांतर्गत संरक्षण सामुग्रीचे उत्पादन 80 टक्क्यांनी वाढले, असे मोदी म्हणाले.
“युपीए’सरकारच्या काळात बुलेटप्रुफ जॅकेटच्या खरेदीसाठी सहा वर्षांचा विलंब केला गेला. त्यामुळे सैनिकांचे जीव धोक्यात आले, अशी टीकाही पंतप्रधानांनी केली. त्याबाबत घराणेशाहीतील नेत्यांना विचारले तर ते “हुआ तो हुआ’ असे उत्तर देतील, अशा शब्दात मोदींनी कॉंग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरही टीका केली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकाळात मिळवलेला विकासदर जर पूर्वीच्या “युपीए’सरकारने टिकवला असता, तर सध्या आहे त्यापेक्षा खूप जास्त असता. 21 व्या शतकातील देशातील प्रगतीसाठी नवमतदारांनी मतदान करावे, असे आवाहनही मोदींनी केले.