पारनेर, नगर, राहुरी तालुक्यांतील के. के. रेंज संदर्भात पवार घेणार संरक्षणमंत्र्यांची भेट
पारनेर – पारनेर, नगर, राहुरी या तीन तालुक्यांतील 23 गावांवर के. के. रेंज विस्तारीकरणाचे मोठे संकट उभे असून, या विस्तारीकरणात अनेक शेतकऱ्यांना आपल्या जमिनीलाच मुकावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी लढा उभा केला. त्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली.
यावेळी पवार यांनी के. के. रेंज विस्तारीकरणाचा विषय हा मला पूर्णपणे माहित आहे. या विषयाबाबत लष्कराने नोटिफिकेशन काढले होते. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आज लोकांनी जमिनी बागायती केल्या आहेत. मुळा धरणावर अनेक जिल्हे अवलंबून असून, नगर शहराला पाणीपुरवठा याच धरणातून होत आहे. के. के. रेंजमुळे या धरणाला संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. या प्रश्नाबाबत तोडगा काढण्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष करण्याची तयारी या भागातील लोकांना ठेवावी लागेल, असेही पवार यांनी सांगितले.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पवार यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी वेळ दिली असून, सदर प्रश्न अग्रक्रमाने मांडू, असा शब्द शरद पवार यांनी आमदार लंके यांना दिला आहे. आमदार लंके यांनी मंगळवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेत या भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा अण्णासमोर मांडली होती.
आज आमदार लंके यांच्या नेतृत्वाखाली या तीनही तालुक्यांचे शिष्टमंडळ मुंबई येथे पवार यांच्या भेटीस गेले व त्यांना निवेदन देत सदर प्रकरणाचा सविस्तर आढावा दिला. या शिष्टमंडळांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही भेट घेत त्यांना या संदर्भात निवेदन देत आपली गाऱ्हाणी मांडली व उपमुख्यमंत्र्यांनीही सदर प्रकरणात लक्ष घालत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडू, असे आश्वासित केले.
यावेळी आमदार लंके यांच्यासमवेत पश्चिम महाराष्ट्र विकास मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, ऍड. राहुल झावरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब बाचकर, नीलेश कोते, अनिल गंधाक्ते, सत्यम निमसे यांच्यासह विविध गावांतून आलेल्या के.के. रेंज बाधित शिष्टमंडळ व शेतकरी या वेळी उपस्थित होते.