नवी दिल्ली – भारत आपल्या राष्ट्रहिताशी कदापिही तडजोड करणार नाही, देशाची संरक्षण क्षमता वाढली असून आपल्या सीमा पूर्ण सुरक्षित असल्याची ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी दिली आहे. जम्मू काश्मिरातील जनतेशी जनसंवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली. सध्या भारत-चीन सीमेवर तणाव आहे, तेथील बराच भाग चिनी लष्कराने व्यापला असल्याचे सांगितले जात आहे त्या पार्श्वभूमीवर प्रथम जाहीर भाष्य करताना त्यांनी ही ग्वाही दिली.
गेल्या काही वर्षात भारताने आपली संरक्षण क्षमता वाढवली असली तरी ती कोणाला घाबरवण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी वाढवलेली नाही असे नमूद करून ते म्हणाले की, देशाच्या सुरक्षेसाठी ही क्षमता वाढवण्यात आली आहे आणि देशाच्या हिताशी कदापिही तडजोड केली जाणार नाही. भारत आणि चीन यांच्यातील तणावाबाबत बोलताना ते म्हणाले की, भारताशी असलेला वाद चर्चेतून सोडवण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे आणि भारत सरकारचीही तीच भूमिका आहे.
लष्करी आणि राजनैतिक पातळीवरील चर्चेतून आम्ही दोन्ही देशांतील संघर्षाच्या स्थितीवर तोडगा काढू भारत चीन सीमेवर सध्या काय चालेले आहे, अशी विचारणा विरोधी पक्षाचे लोक करीत आहेत, पण सरकारी त्या विषयी लोकांना सतत माहिती देत असून विरोधकांचेही लोकशाहीत महत्त्वाचे स्थान आहे आणि त्यांच्या भावनांचीही आम्ही कदर करत आहोत असे ते म्हणाले.
येत्या जुलै महिन्यात भारतीय हवाईदलात राफेल विमाने दाखल होत आहेत त्यातून भारताची हवाईमारक शक्ती खूप वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.