यांचा ठाम विश्वास
काल्का (हरियाणा) – पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला चिथावणी आणि सक्रिय मदत करणे थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानबरोबर चर्चा होणे शक्य नाही. जर चर्चा झालीच तर ती केवळ् पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके)बद्दलच होईल, असा ठाम विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या प्रारंभाच्यावेळी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.
“जर पाकिस्तानबरोबर चर्च झालीच तर ती “पीओके’बाबतच होईल. अन्य कोणत्याही विषयाबाबत होणार नाही. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला सहाय्य करणे थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानबरोबर कोणतीही चर्चा होणार नाही.’ असे राजनाथ सिंह म्हणाले.
370 वे कलम रद्द केल्यामुळे पाकिस्तान कमकुवत झाला आहे. हीच पाकिस्तानसाठीची सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. आता “पीओके’सहाय्यासाठी प्रत्येक देशाचा दरवाजा ठोठावत आहे. आम्ही कोणता गुन्हा केला ? आम्हाला कोणती शिक्षा दिली जाते आहे. धमकावले का जात आहे, अशी विचारणा “पीओके’ करत आहे. जगातील सर्वात सामर्थ्यशाली अमेरिकेनेही पाकिस्तानला दटावले आहे आणि भारताबरोबर चर्चा सुरू करण्यास सांगितले आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
दहशतवादाच्या आधारे पाकिस्तान भारताला अस्थिर आणि कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र निर्णय कसा घेतला जातो, हे पंतप्रधानांनी पाकिस्तानला दाखवून दिले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने बलाकोट इथे एअरस्ट्राईक केला. हा हल्ला झालाच नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान आतापर्यंत म्हणत होते. मात्र आता भरत बालाकोटपेक्षाही अधिक मोठा हल्ला करण्याची तयारी करत असल्याचे ते म्हणू लागले आहेत. यातूनच त्यांनी बालाकोटचा हल्ला मान्य केल्याचे सिद्ध होत असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.