कोलकाता – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जय श्रीरामची नारेबाजी झाल्याचे समोर आले आहे. कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाषणासाठी व्यासपीठावर आल्या असताना जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या. या नारेबाजीमुळे व्यथित झालेल्या ममता यांनी भाषण देण्यास नाकार देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाजपला फटकारलं होतं. यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील शाब्दिक चकमक आणखी तीव्र झाली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राक्षसी संस्कृतीच्या आहेत, तसेच त्यांच्या डीएनए मध्येच दोष असल्याची टीका उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी केली आहे. ममता यांच्यावर टीका करताना भाजपनेते पातळी सोडत असल्याचे चित्र आहे.
बॅनर्जी यांच्या डीएनने मध्येच दोष आहे. त्यांची संस्कृती राक्षसी आहे. राक्षसी संस्कृतीचा व्यक्ती भगवान रामावर प्रेम करू शकतो का ? नाही, ममता बॅनर्जी यांना भगवान रामाबद्दल घृणा असणे स्वाभाविक आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रमाणे हिंसा होत आहे, त्यानुसार बॅनर्जी या राक्षसी संस्कृतीच्या असल्याचे सिद्ध होत आहे असेही सिंह म्हणाले. यावेली त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. मोदी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यापेक्षा उत्तम पंतप्रधान असल्याचे सिंह यांनी सांगिलते.