नवी दिल्ली – केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवार मागीत तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. तर सरकार देखील माघार घेण्यास तयार नाही. मात्र पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत भाजपला कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा असलेला रोष मतपेटीतून दिसून आला आहे.
पंजाबमध्ये 14 फेब्रुवारी रोजी आठ नगरपालिका, 109 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीचा निकाल आज समोर आला आहे. या निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसताना दिसत आहे. विशेष म्हणजे भाजप खासदार सनी देओल यांच्या मतदारसंघात असलेल्या सर्व 29 जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. या सर्व जागांवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.
शेतकरी आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी एक इंचही मागे हटणार नाहीत, अशी भूमिका मांडली होती. याशिवाय संसदेच्या अधिवेशनातही त्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. त्यामुळे पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं दिसत आहे . सनी देओल यांच्या गुरदासपूर लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा झटका बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नागरिकांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. तर सनी देओल यांच्या मतदारसंघात सर्व 29 जागांवर भाजपचा पराभव झाला आहे.